पेसा कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करा – राज्यपाल सी.विद्यासागर राव

DSC_5260
यवतमाळ , दि. १०(विशेष प्रतिनिधी)- पंचायत क्षेत्र विस्तार अधिनियम (पेसा) हा आदिवासी क्षेत्राच्या विकासासाठी अतिशय महत्वाचा अधिनियम आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पेसा क्षेत्रात या अधिनियमाची काटेकोरपणे अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे आदिवासी बांधवांना सिंचनाच्या सोई उपलब्ध करुन देण्यासाठी वनक्षेत्रात पाणी अडविण्यासाठी बंधाऱ्यांचा उपक्रम राबविणे आवश्यक आहे, असे राज्यपाल सी.विद्यासागर राव यांनी सांगितले. राज्यपालांनी येथील बचत भवनात पेसा व वनहक्क कायदा तसेच आदिवासींसाठी राबविण्यात येत असलेल्या विविध विकास कामांचा आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी या सुचना केल्या. बैठकीला राज्यपालांचे सचिव विकासचंद्र रस्तोगी, उपसचिव परिमल सिंह, विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजुरकर, मुख्य वनसंरक्षक श्री.गुरमे, जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल, पोलीस अधीक्षक संजय दराडे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.शरद कुळकर्णी, अप्पर जिल्हाधिकारी राजेश खवले यांच्यासह सर्व विभाग प्रमुख अधिकारी उपस्थित होते. पेसा अधिनियमाने आदिवासी क्षेत्रातील गावांना विकासासाठी बरेच अधिकार दिले आहे. या अधिकारान्वये या क्षेत्रातील गावांचे विकासाचे नियोजन, नैसर्गिक साधन संपत्तीवरील अधिकार, वनउपज आदींचे व्यवस्थापन संबंधीत गावांच्या ग्रामसभेला करावयाचे आहे. अशा ग्रामसभांमध्ये लाभार्थी निवडण्यासोबतच संपुर्ण गावाचे विकासाचे नियोजन करण्यासाठी यंत्रणेने पुर्ण क्षमतेने काम केले पाहिजे, अशा सुचनाही राज्यपालांनी बैठकीत केल्या. वनहक्क कायद्याअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना वनहक्काचे वैयक्तिक तसेच गावाच्या विकासासाठी सामुहिक दावे जास्तीस जास्त प्रमाणात मंजुर होणे आवश्यक आहे. या कायद्याच्या जनजागृतीसोबतच अधिकाधिक दावे दाखल होण्यासाठी प्रयत्न आवश्यक आहे. आदिवासी विशेषत: पेसा क्षेत्रात आदिवासी विकासाच्या योजना चांगल्या पध्दतीने राबविल्या जाव्या. आदिवासी उपयोजनेअंतर्गत योजना राबवित असतांना लाभार्थ्यांची निवड ही ग्रामसभेकडून झाली पाहिजे. वैयक्तिक लाभार्थ्यांची निवड करून त्यांना योजनांचा लाभ मिळावा. वनक्षेत्रात सिंचानाच्या सोई उपलब्ध करण्यासाठी सिमेंट नाला बंधारे उभारणीला वनविभागाने प्राधान्य दिले पाहिजे. सिंचनाच्या सोई उपलब्ध झाल्यास आदिवासी क्षेत्रातील गावांना त्याचा फायदा होईल, असे राज्यपाल म्हणाले.
पेसा क्षेत्रातील विज जोडणीचा आढावा घेतांना या क्षेत्रात प्रत्येक कुटुंबाला विज जोडणी देणे आवश्यक आहे. विज जोडण्या शिल्लक असल्यास त्या तातडीने पुर्ण करण्याचा दृष्टीने नियोजन करावे, असे सांगत आदिवासी भागातील शौचालयाचे बांधकाम, पाणीपुरवठा, आरोग्य आदींचीही माहिती राज्यपालांनी जाणून घेतली. यावेळी शेतकरी आत्महत्येमागील कारणे जाणून घेतल्यानंतर शेतकऱ्यांच्या मानसिकतेत बदल करण्यासाठी समुपदेशनासारखे कार्यक्रम घेवून शेतकऱ्यांचे आत्मबल वाढविण्यासाठी गावपातळीवर प्रयत्न करावे, अशा सुचनाही यावेळी त्यांनी केल्या. राज्यपालांचे सचिव विकासचंद्र रस्तोगी तसेच उपसचिव परिमल सिंह यांनी पेसा कायद्याच्या अंमलबजावणीवर सर्व संबंधीत अधिकाऱ्यांनी जातीने लक्ष देणे आवश्यक आहे, असे सांगून विविध सुचना केल्या. सुरुवातीस जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांनी सादरीकरण केले. पेसा कायद्याच्या अंमलबजावणीची माहिती त्यांनी दिली. तत्पूर्वी राज्यपाल सी.विद्यासागर राव यांनी शिष्टमंडळांना भेटी देवून निवेदने स्विकारली व शिष्टमंडळांशी चर्चा केली. एकूण 10 शिष्टमंडळांनी निवदने सादर केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


nine − 2 =