आर्णी –लग्नातील पैशावरुन बंजारा समाजाच्या नाईकाचा विळ््याने वार करुन खून केल्याची घटना १ मे रोजी सायंकाळी बोरगाव येथे घडली. यामध्ये नाईकाचा मुलगा जखमी असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. याप्रकरणी तीन जणांना अटक केली असून १५ जणाविरुद्घ गुन्हे दाखल केले.
भगवान रामलाल राठोड (६५) रा. बोरगाव दाभडी असे मृतक नाईकाचे नाव आहे. किरण भगवान राठोड (३०) असे जखमीचे नाव आहे. १ मे रोजी बाबुसिंग रामचंद्र राठोड याच्या मेव्हण्याच्या मुलीचे लग्न होते. लग्न विधी आटोपल्यानंतर वधु मुलीला माहेरी पाठविताना बंजारा समाजातील रितीरीवाजाप्रमाणे मुलगा व मुलगी यांच्या वडीलाकडून तांटतील नाईकाला पैसे दिले जाते. यावेळी भगवान राठोड हे तांट्याचे नाईक हे होते. दरम्यान बाबुसिंग राठोड याने पैसे देऊ नये असे मेव्हण्याला सांगितले. त्यावरुन दोन गटामध्ये वाद निर्माण होऊन तुंबड हाणामारी झाली. यावेळी बाबुसिंग राठोड (५०), नितेश बाबुसिंग राठोड (२५), योगेश बाबुसिंग राठोड (२२), शालु बाबु सिंग राठोड (४०) यांनी नाईक भगवान व त्याचा मुलगा किरण राठोड (३०) याच्यावर विळ््याने सपासप वार करुन गंभीर जखमी केले. यावेळी दोघांनाही शासकीय रुग्णालयात दाखल केले मात्र भगवानचा उपचार दरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी रविंद्र भगवान राठोड (३०) याने दिलेल्या तक्रारीवरुन आर्णी पोलिसांनी गुन्हे दाखल करुन तीन आरोपींना अटक केली. तर बाबुसिंग याने पोलीसात तक्रार दिली असून मृतक भगवान राठोड, किरण राठोड, पिंट्या राठोड, मणिबा राठोड, किशोर राठोड, सविता राठोड, भगवान राठोड, रवि राठोड, वर्षा राठोड, मुरली राठोड, राजेश राठोड, गुंफा राठोड यानी पैसे न दिल्याने लाथा बुक्यांनी मारहाण केल्याची तक्रार दिली. त्यावरुन पोलिसांनी अकरा जणाविरुद्घ गंभीर गुन्हे दाखल केले. या घटनेने गावात खळबळ उडाली असून शोककळा पसरली आहे.









