
औरंगाबाद – नव्या वर्षात नेटवर्क वाढविण्यासाठी तरुणांत जनजागृती करणे, बिट सिस्टीम सुधारणे, गुन्हेगारांची कार्यपद्धती विभाग अपडेट करण्याचा निर्धार पोलिस खात्याने नव्या वर्षात केला आहे.
पोलिस खात्यात आरोपींची माहिती काढण्यासाठी खबऱ्यांचा मोठा वापर करण्यात येतो. बहुतांश वेळा हे खबरी गुन्हेगारच असतात. पोलिसांना केलेल्या मदतीचा अनेक वेळा त्यांच्याकडून गैरफायदा घेतला जातो. त्यामुळे खबरी म्हणून गुन्हेगार पोसण्यापेक्षा शहरवासियांमध्ये गुन्हेगारी रोखण्याबाबात जनजागृती करण्यावर नव्या वर्षात भर दिला जाणार आहे. या प्रवाहात प्रामुख्याने शालेय विद्यार्थी व महाविद्यालयीन युवकांना सामाविष्ट करून घेण्यात येणार आहे.
प्रत्येक पोलिस ठाण्याअंतर्गत बिट वाटून दिले आहेत. पोलिस चौक्यांची निर्मिती करण्यात आली आहे. या बिटचे प्रमुख त्यांची जबाबदारी पूर्ण करण्यात पोलिस कमी पडत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे बिट सिस्टीम प्रभावी करण्यावर भर दिला जाणार आहे. याचा फायदा पोलिस ठाण्यांना होणार असून त्यांचावरील भार हलका होण्यास मदत होणार आहे.
नव्या वर्षात प्रत्येक पोलिस ठाण्यात एक पीएसआय व तीन कर्मचाऱ्यांचा समावेश असलेले सायबर पथक निर्माण करण्यात येणार आहे. छोट्या स्वरुपाच्या तक्रारी हे सायबर पथक सोडवणार असून मोठ्या तक्रारी आयुक्तालयातील सायबरसेल सांभाळणार आहे. पोलिस आयुक्तालयात गुन्हेगारांची कार्यपध्दती ( मोडस ऑपरेंडी ब्युरो ) हा विभाग कार्यरत आहे. या विभागाचे संगणकीकरण करून त्यांना अद्ययावत प्रशिक्षण देऊन या विभागाला आधुनिक करण्याचा संकल्प आहे.









