
मुझफ्फरपूर- बिहारमधील मुजफ्फरपूरमध्ये प्रेमसंबंधातून एका विद्यार्थ्याची हत्या केल्यानंतर हे प्रकरण चिघळले असून गावातील ४० घरांना रविवारी रात्री आग लावण्यात आली. यात तिघांचा होरपळून मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी दहा जणांना अटक केली आहे.
पाटणापासून ५५ किमी अंतरावर असलेल्या मुजफ्फरपूर जिल्ह्यात सरैय्या भागातील अजीजपुर गावात रविवारी ही संतापजनक घटना घडली. संतप्त जमावाने घरे, ट्रॅक्टर, दुचाकी आणि अन्य वाहनेही पेटवून दिली. यात काहीजण जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी सरकारी रुग्णालयात दाखल केले आहे. बहिलवारा या गावातील भारतेंदु या एलएस महाविद्यालयातील विद्यार्थ्याचे मुस्लिम तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. गेल्या आठवड्यात नऊ जानेवारी रोजी भारतेंदु याचे अपहरण करण्यात आले होते. रविवारी दुपारी अजीजपुर गावापासून जवळच असलेल्या शेतात एका पोत्यामध्ये भारतेंदु याचा मृतदेह आढळला. त्यामुळे बदल्याच्या रागातून हे कृत्य करण्यात आले असावे, असा पोलिसांना संशय आहे. या घटनेनंतर गावातील परिस्थिती तणावपूर्ण असली तरी नियंत्रणात आहे. परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. येथील पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. या घटनेत मृत्यू झालेल्या नागरिकांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपयांच्या मदतीची सरकारकडून घोषणा करण्यात आली आहे. तर जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. तसेच सीतामढी, मुजफ्फरपूर, छपरा आणि वैशाली जिल्ह्यातील अतिरिक्त पोलिस घटनास्थळी तैनात करण्यात आले आहेत. तसेच लष्कराचे ३०० जवानांची कुमकही येथे तैनात करण्यात आली आहे.









