
नवी दिल्ली- आम्ही दिलेल्या आदेशानुसार जर राज्यातील अधिका-यांच्या बदल्या केल्या नाही तर पश्चिम बंगालमधील लोकसभेच्या निवडणुकाच रद्द कराव्या लागतील असा इशारा केंद्रीय निवडणूक आयोगाने दिला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पाच पोलिस अधिक्षक, एक जिल्हाधिकारी आणि दोनन अतिरिक्त जिल्हा न्यायदंडाधिका-यांच्या बदलीचे आदेश निवडणूक आयोगाने दिले होते. मात्र या अधिका-यांच्या बदल करण्यास मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नकार दिला. यावर निवडणूक आयोगाने थेट राज्यातील निवडणुकाच रद्द करण्याचा इशारा दिला आहे. तसेच यासंदर्भात राज्याच्या मुख्य सचिवांच्या विरोधात कारवाइ केली जाईल असेही आयोगाने म्हटले आहे. या अधिका-यांच्या विरोधात तक्रारी आल्यानंतर निवडणूक आयोगाने त्यांची बदली करण्याचे आदेश दिले होते. यासंदर्भात बॅनर्जी यांनी थेट निवडणूक आयोगावर हल्लाबोल केला होता. आयोग आपल्या विरोधात असलेल्या काँग्रेस, भाजप आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे एंजट असल्याची टीका त्यांनी सोमवारी केली होती. तसेच या बदल्यामुळे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी निवडणूक आयोगावर असेल असेही बॅनर्जी म्हणाल्या होत्या. दरम्यान, राज्याच्या मुख्य सचिवांनी निवडणूक आयोगाला या अधिका-यांच्या बदल्यांच्या संदर्भात पुन्हा एकदा विचार करण्याची विनंती केल्याचे सूत्रांनी सांगितले. मुख्य सचिवांनी आयोगाला लिहलेल्या पत्रात, अधिका-यांच्या बदल्या राज्य सरकारशी चर्चा केल्यानंतरच होऊ शकते असे म्हटले आहे.









