
गलोर- भारताच्या २३ वर्षाखालील फुटबॉल संघाने मैत्रीपूर्ण मालिकेतील सलामीच्या लढतीत रविवारी पाकिस्तानचा १-० पराभव केला. पहिले सत्र संपायला काही सेकंद बाकी असताना कर्णधार सुनील छेत्रीने केलेला गोल मोलाचा ठरला.
भारताला सामन्यात मिळालेल्या गोलांच्या अनेक संधी पाहता मोठय़ा फरकाने विजय शक्य होता. मात्र भारताचे अन्य फुटबॉलपटू गोल करण्यात अपयशी ठरले. त्यातच ६९व्या मिनिटाला दुस-यांदा पिवळे कार्ड दाखवले गेल्यामुळे रॉबिन सिंगला मैदान सोडावे लागले. त्यामुळे उर्वरित २० मिनिटे १० जणांसह खेळण्याची वेळ यजमानांवर आली. अखेरच्या काही मिनिटांमध्ये कर्णधार कालीमुल्लासह पाकिस्तानलाही गोलच्या दोन संधी होत्या. मात्र भारताच्या बचावपटूंनी अभेद्य बचाव केला. गोलकीपर अमरिंदरनेही काही चांगले ‘सेव्ह’ केले. राल्टे, देसाई यांनीदेखील गोलसाठी काही चांगले प्रयत्न केले.
विजयी प्रारंभासह दोन सामन्यांच्या मालिकेत भारताने १-० अशी आघाडी घेतली. मालिकेतीव दुसरी लढत बुधवारी बंगलोर स्टेडियमवरच खेळण्यात येणार आहे. पुढील महिन्यात इन्चॉनमध्ये (दक्षिण कोरिया) होणाऱ्या एशियाडची तयारी म्हणून या दोन सामन्यांकडे पाहण्यात येत आहे. त्यातच भारत सुरुवातीपासून पाकिस्तानविरुद्ध विजयाचा दावेदार राहिला आहे. उभय संघांमध्ये येथील लढतीसह आतापर्यंत झालेल्या ३२ सामन्यांमध्ये भारताचे १९ विजय असून पाकिस्तानचे पाच विजय आहेत.









