

आर्णी, दि. ३ – सोशल नेटवर्कवर धार्मिक भावना भडकवणारे लिखाण केल्याची घटना रात्री उघडकीस आल्यानंतर आर्णी कडकडीत बंद ठेवून या घटनेचा निषेध करण्यात आला. आंदोलनकर्त्यांनी रास्तारोको करण्यासाठी नागपूर-तुळजापूर महामार्गावर टायर जाळले.
सागर रवींद्र आक्केवार (२३) रा.आर्णी मित्राच्या मोबाईलवर फेसबुक अकाऊंट ओपन केले असता ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी सागर आक्केवार याने आर्णी पोलीसात तक्रार दिली. त्यावरून हसमेन आलम याच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला. आज सकाळी या घटनेच्या निषेधार्थ संपूर्ण शहर कडकडीत बंद करण्यात आले. आरोपीला अटक करण्यात यावी अशी मागणी केली. यावेळी निलेश गांवडे, अश्विन बोमंपिलेवार, प्रमोद कांगे, तुफान जाधव, भारत चांदेकर, उध्दव वानखडे, पवन येरावार, निलेश इंगोले यादी कार्यकर्ते उपस्थित होते. एसटी बस स्थानकासमोर टायर जाळून पाच मिनिट रास्ता रोको केला. पोलीस घटनास्थळी दाखल झाल्याने कोणतीही अनुचित घटना घडली नाही. आर्णी वासीयांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन ठाणेदार गायकवाड यांनी केले.









