
नवी दिल्ली – उत्तरप्रदेशचे भाजप प्रभारी आणि नरेंद्र मोदी यांचे अत्यंत विश्वासू सहकारी अमित शहा यांनी मुजफ्फरनगर जवळच्या दंगल पिडीत जाट गावात जातीयवादी चिथावणीखोर वक्तव्य केल्याचे समोर आले आहे.
मुजफ्फरनरपासून जवळच असलेल्या राजहार गावामध्ये घेतलेल्या निवडणूक प्रचारसभेमध्ये बोलताना शहा यांनी तुम्हाला बदला घ्यायचा असेल तर, भाजप उमेदवाराला मतदान करा. तुम्ही तलवारी किंवा अन्य अस्त्रांनी हा विषय सोडवू शकत नाही असे वादग्रस्त विधान केले होते. आज भाजपला मतदान करुन तुम्ही बदला घेऊ शकता. तुमच्या बरोबर न्याय झालेला नाही ही बदला घ्यायची वेळ आहे. मुघल शासनाच्या काळात तलवारी आणि अस्त्रांनी सूड उगवला जायचा पण आता तुम्ही मतदानाने बदला घेऊ शकता. त्यांची योग्य जागा दाखवण्यासाठी तुम्ही योग्य ठिकाणी बटण दाबा असे वादग्रस्त विधान शहा यांनी केले आहे. अमित शहा यांच्या विधानावर काँग्रेसने जोरदार टीका केली आहे. काँग्रेस नेते सत्यव्रत चर्तुवेदी यांनी भाजपला काही प्रश्न विचारले आहेत. सोनिया गांधी यांनी शाही इमामांची भेट घेतली तर, भाजपने काँग्रेस जातीयवादाचे राजकरण करत असल्याचा आरोप केला. आता भाजपचे नेते भावना भडकविणारी विधाने करत आहेत. अमित शहा यांच्या विधानावर आता भाजपची काय भूमिका आहे असा सवाल चर्तुवेदी यांनी केला. भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी निवडणूक प्रचारामध्ये स्वत:ला जातीयवादापासून दूर दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांचेच निकटवर्तीय अमित शहा यांच्या या विधानामुळे नरेंद्र मोदी अडचणीच सापडले आहेत.









