१४ मार्च रोजी महाराष्ट्रात प्रदर्शित होणार
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री, व्यासंगी नेते, अभ्यासू व्यक्तिमत्व, दूरदृष्ट्री असलेलं कार्यकुशल नेतृत्व अशा अनेक बिरुदावल्या लाभलेले व्यक्तिमत्व म्हणजे मा. यशवंतराव चव्हाण. वैयक्तिक आयुष्यासोबतच राजकीय आणि सामाजिक जीवनातही अतिशय आव्हानात्मक परिस्थितींवर यशस्वीपणे मात करणा-या यशवंतरावांचा जीवनपट खूप रंजक असा आहे. त्यांच्या याच जीवनप्रवासावर आधारीत यशवंतराव चव्हाण – बखर एका वादळाची हा जब्बार पटेल दिग्दर्शित चित्रपट येत्या १४ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानची निर्मिती असलेल्या या चित्रपटाची प्रस्तुती महाराष्ट्र शासन आणि एस्सेल व्हिजनची आहे.
यशवंतराव चव्हाण या चित्रपटातून महाराष्ट्र आणि देशाची तत्कालीन राजकीय, सामाजिक परिस्थिती , यशवंतरावांचे दुरदर्शी निर्णय, झंझावाती कारकिर्द पटकथेतून चपखलपणे मांडण्याचं काम ज्येष्ठ लेखक, पत्रकार अरूण साधू यांनी केलं आहे. पटकथेसोबतच चित्रपटातील गीतेही कथानकाचाच एक भाग म्हणून प्रेक्षकांसमोर येणार आहेत. महाराष्ट्राच्या निर्मितीकाळातील लोकसंगीत, साहित्य आणि समाजकारणातील उर्जितावस्था, लोककलांचे महत्त्व लक्षात घेऊन संगीताची मोलाची जबाबदारी आनंद मोडक यांनी या चित्रपटात सांभाळली आहे. चित्रपटात विविध बाजाची एकूण १६ गाणी असून ती अनेक नामवंत गायकांनी स्वरबद्ध केली आहेत.
“यशवंत असा गुणवंत”, “स्वातंत्र्य लढे पेटले”, “स्वातंत्र्याचा पोवाडा”, “यशवंत बहुगुणवंत”, “संयुक्त महाराष्ट्राचा पोवाडा” ही प्रसिद्ध कवी-गीतकार ना. धों. महानोर यांनी शब्दबद्ध केलेली स्फुर्तीदायक गीते आणि “देशभक्ता प्रासाद” हे विनायक करंदीकर यांनी लिहिलेलं गीतही ऐकायला मिळणार आहे. नंदेश उमप आणि सहका-यांनी ही सर्व गीते गायली आहेत. “संगमरवर या नद्यांचे” हे ना. धों. महानोर यांच्याच लेखणीतून उतरलेले गीत रविंद्र साठे आणि विभावरी आपटे यांनी गायलं आहे. यशवंतरावांच्या आई विठाबाई चव्हाण या प्रतिभावान कवयित्रीही होत्या. त्यांच्या याच प्रतिभेची झलक या चित्रपटातील गाण्यांमधूनही बघायला मिळणार आहे. या चित्रपटातील “गडगड आभुटं”, “नादारीचं दीस”, “मायबापाच्या पोटी” या त्यांच्या मुळ रचना यात ऐकता येणार असून या रचनांमध्ये काही शब्दांची भर घालत ना.धों. महानोरांनी त्याला गीताचं स्वरुप दिलं आहे. आणि ही गाणी आपल्या ठसकेबाज आवाजात सादर केली आहेत उर्मिला धनगर यांनी. याशिवाय “सखे नयन कुरंग” हे पारंपरिक बाजाचं गीतही उर्मिलाने गायलं आहे. याशिवाय चित्रपटात “उलटी हो गई तदबीरे सारी” ही मीर-तकी-मीर यांची भावपूर्ण रचना आरती अंकलीकर यांच्या आवाजात ऐकायला मिळणार आहे. “उभविला मळा” ही भैरवी आणि “खालच्या आळीत गातो” ही निराळ्या बाजातील महानोरांची गीते अनुक्रमे रविंद्र साठे आणि आनंद शिदे यांनी गायली आहेत. याशिवाय कुसुमाग्रज यांच्या शब्दप्रतिभेतूनउतरलेलं गर्जा जयजयकार हे गीत शंकर महादेवन यांनी स्वरबद्ध केलं आहे. व्हिडीओ पॅलेसच्या वतीने या चित्रपटाच्या गाण्यांची ध्वनिफित बाजारात उपलब्ध करण्यात आली आहे.
महाराष्ट्राचा हा लाडका नेता आपल्या अभिनयातून साकार करण्याची किमया साधली आहे अशोक लोखंडे यांनी तर लुब्ना सलिम , ओम भुतकर, वैशाली दाभाडे, मीना नाईक, रेखा कामत, सुप्रिया विनोद, सतीश आळेकर, राहूल सोलापूरकर, बेंजामीन गिलानी यांच्या अन्य महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. येत्या १४ मार्च रोजी हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.











