
यवतमाळ, दि. २० – सुप्रिम कोर्टाने मुक्त आणि निष्पक्ष निवडणुकीसाठी पेपर ट्रेल अनिवार्य केले होते. मात्र २०१४ मध्ये पार पडलेल्या निवडणुकीत इव्हीएम मशीनमध्ये पेपर ट्रेल लावण्यात आले नाही. त्यामुळे इव्हीएमच्या माध्यमातून घोटाळा करण्यात आला. असा आरोप करीत बहुजन मुक्मी पार्टीच्यावतीने आज शहरातून इव्हीएमची अंत्ययात्रा काढण्यात आली. त्यानंतर स्थानिक बसस्थानक चौकात त्याचे दहन करण्यात आले.
सुप्रिम कोर्टाने निवडणूक आयोगाला इव्हीएम मशीनमध्ये पेपरट्रेल अनिवार्य केले होते. त्यानुसार राज्यातील लोकसभा व विधानसभा निवडणुकीत त्याचा वापर होणे गरजेचे होते. व याबाबत भारत मुक्ती मोर्चाने इव्हीएमबद्दल राज्यभर जनजागरण केले होते. मात्र निवडणूक आयोगाने पेपरट्रेलचा वापर न करता निवडणूक प्रक्रीया पार पडली. त्या निषेधार्थ आज महात्मा फुले चौक, पाच कंदील चौक, हनुमान आखाडा चौक, तहसील चौक, आंबेडकर चौक, शारदा चौक, मार्इंदे चौक, वीर वामनराव चौक, दत्त चौक या मार्गाने भ्रमण करून बसस्थानक चौकात इव्हीएमचे दहन करण्यात आले. यावेळी बहुजन मुक्ती पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.









