बाटलीबंद पाण्यामुळे कॅन्सरचा धोका

mineral-water-330x185
मुंबई दि. ३ – तुम्ही ‘मिनरल वॉटर’ पीत असाल तर सावधान! कारण जे पाणी तुम्ही ‘आरोग्यवर्धक’ समजता, त्याच पाण्यामुळे तुम्हाला कॅन्सर होऊ शकतो, अशी धक्कादायक माहिती ‘भाभा रिसर्च सेंटर’ने नुकत्याच केलेल्या संशोधनातून समोर आली आहे.
परिणामी हे पाणी ‘पाणी न ठरता विष’ ठरणार असल्याने या पाण्यावर बंदी आणावी, अशी मागणी मुंबई महापालिकेतील नगरसेवकांनी केली आहे. मुंबईकरांसह सर्वानाच आता या पाण्याची सवय लागल्याने १० ते १५ रुपये अशा चढय़ा दरात हे पाणी विकले जात आहे. हे पाणी बाटलीबंद करून विकले जात असल्याने या पाण्यात प्लास्टिकमधील ब्रोनेट, क्लोराइड इत्यादी रसायनांचा अंश असतो.
या रसायनांमुळे कॅन्सरसारखा आजार उद्भवू शकतो. याशिवाय किडनीवरही विपरीत परिणाम होण्याची शक्यता ‘भाभा रिसर्च सेंटर’ने केलेल्या संशोधनातून समोर आली आहे. त्यामुळे या पाण्यावर बंदी आणावी, अशी मागणी काँग्रेसचे नगरसेवक परमिंदर भमरा यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे केली आहे.
दरम्यान, बाटलीबंद पाणी प्यायल्यानंतर या बाटल्या कुठेही फेकल्या जातात. प्लास्टिक नष्ट होत नसल्यामुळे घातक कचरा तयार होतो. प्लास्टिकच्या बाटल्या नष्ट होण्यास ७०० वर्षापेक्षाही अधिक काळ लागत असल्याचेही ‘भाभा रिसर्च सेंटर’च्या संशोधन अहवालात नमूद करण्यात आले आहे.
त्यामुळे बाटलीबंद पाण्याच्या विक्रीवर मुंबईत कडक निर्बंध घालावेत, अशी मागणी परमिंदर भमरा यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे महापौरांकडे केली आहे. याबाबत राज्य सरकारकडूनही योग्य ती कार्यवाही व्हावी, यासाठी महापालिकेच्या वतीने प्रयत्न केला जावा, असे त्यांनी म्हटले आहे.
बाटलीबंद पाणी महिलांसाठी अतिशय घातक!
बाटलीबंद पाणी महिलांसाठी सर्वाधिक धोकादायक आहे. गर्भाशयाजवळ होणारी फायब्रॉईडची गाठ अशाच पाण्याच्या सेवनामुळे होत असल्याचे स्त्रीरोगतज्ज्ञांचे मत आहे. ८० ते ९० टक्के महिला फायब्रॉईडच्या गाठीमुळे त्रस्त असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


4 × = twenty four