
मुंबई – शिवसेनेचा २०१६ मध्ये सुवर्णमहोत्सव आहे हा सुवर्णक्षण शिवसेनेचा मुख्यमंत्री साजरा करेल. या सोहळ्यापर्यंत महाराष्ट्रात किमान ५० योजना आम्ही पूर्ण करणार, अशी ‘ती’ महत्वाची घोषण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बीकेसीतील जाहीर सभेत केली. भाजपशी या निवडणुकीत युती केली असती तर शिवसेना संपली असती, असा हल्लाबोलही उद्धव यांनी केला. सभेचा शेवट करताना उद्धव आणि आदित्य यांनी जनसमुदायासमोर नतमस्तक होत ‘तुमच्या प्रेमाचा मी कधीही उतराई होऊ शकत नाही’, अशा भावना व्यक्त केल्या.
‘वेडात मराठे वीर दौडले साथ’, असे म्हणून चालणार नाही आता ‘वेडात मराठे वीर दौडले एकसाथ’ असा नारा देत अंगार दाखवा आणि महाराष्ट्रावर भगवा फडकवा. बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करणारा. पुढच्या दोन वर्षात उद्याचा महाराष्ट्र कसा असेल हे मी दाखवून देईन. माझी लढाई महाराष्ट्रासाठी आहे. तुम्ही मला प्रेम द्या, तुमचा विश्वसघात होणार नाही याची हमी मी देतो’, अशी सादही उद्धव यांनी महाराष्ट्रातील जनतेला यावेळी घातली.
मोदींच्या सभेला गुजरामधून माणसे आणली!
उद्धव यांच्या भाषणात मोदी आणि भाजपच मुख्य लक्ष्य होतं. सुरुवातीलाच त्यांनी मोदींच्या बोरिवलीतील सभेला गुजरातमधून बसेस भरभरून माणसे आणली गेल्याचा आरोप केला. आजपर्यंत आमचं प्रेम अनुभवलंत आता शिवसेनेच्या अंगाराची धग सोसा, असा इशाराही उद्धव यांनी भाजपला दिला.









