भाजपला सत्तेवर आणण्याचे परिणाम सोसा- पतंगराव कदम

4975777276426658793_Org
सांगली – ‘तुम्ही भाजपचे सरकार सत्तेवर आणले, आता त्याचे परिमाण सोसा,’ असे म्हणत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री पतंगराव कदम यांनी येथील ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर आगपाखड केली. सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी दिलेल्या पहिल्या उचलीत मोठा फरक आहे. हा अन्याय दूर करावा, अशी मागणी करण्यासाठी काही शेतकरी कदम यांच्याकडे गेले होते. यावेळी कदम यांनी संबधित शेतकऱ्यांना असे सुनावले.
सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी १९०० रुपये प्रतीटन या प्रमाणे पहिला हप्ता देण्याची तयारी दर्शविली असताना कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी मात्र २५०० रुपयावर दर जाहीर केला आहे. दोन दिवसांत एफआरपीप्रमाणे दर दिला तर ठीक, अन्यथा आम्ही ऊस तोडी बंद करू, असा इशारा देणारे निवेदन भिलवडी भागातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी कदम यांना दिले.
सांगली जिल्ह्यातील साखर उतारा आणि ऊसाची प्रत कोल्हापूरपेक्षा चांगली आहे. असे असताना कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखाने सांगलीपेक्षा अधिक ६०० ते ७०० रुपये इतका ऊस दर देत आहेत. त्यामुळे सांगली जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकरी अस्वस्थ झाला आहे.
केंद्राच्या एफआरपीकायद्याप्रमाणे यंदा ९.५ टक्के साखर ऊताऱ्यासाठी प्रतिटन २२०० रुपये एफआरपी आहे. त्यानंतरच्या प्रत्येक १ टक्का उताऱ्याला २२० रुपये द्यावे लागणार आहेत. जिल्ह्यातील बहुतांशी साखर कारखान्यांची एफआरपी २३५० रुपयांपेक्षा अधिक आहे. जिल्ह्यातील सरासरी एपआरपी २८८० रुपये आहे. त्यामुळे याप्रमाणे दर द्यावाच लागणार आहे.
दरम्यान, ऊस गाळपानंतर १४ दिवसांच्या आत ‘एफआरपी’ कायद्यानुसार पहिली उचल न दिलेल्या साखर कारखान्यांची मालमत्ता जप्तीचा प्रस्ताव साखर सहसंचालकांनी साखर आयुक्तांकडे पाठविला असल्याचे सांगण्यात येते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


6 × four =