भाजप म्हणजे द्वेषाचे राजकारण – सोनिया गांधी

sonia-253

लखीमपुर (आसाम)- भाजपचे नेते केवळ मोठ्या गप्पा मारतात आणि द्वेषाचे राजकारण करतात, असा हल्लाबोल काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केला. लखीमपूर येथे काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारसभेत त्या रविवारी बोलत होत्या.

सध्या भाजपचे नेते देशभरात फिरून विकासाच्या मोठ्या गप्पा मारत आहेत. मात्र भाजपशासित राज्यांमध्ये कोणता विकास झाला, असा प्रश्न उपस्थित करत भाजपच्या बोलण्यात आणि करण्यामध्ये खूप मोठा फरक आहे, असे टीकास्त्र त्यांनी सोडले. २००९मध्ये प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यातील बहुतेक सर्व आश्वासने यूपीए सरकारने पूर्ण केली आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यातील सर्व आश्वासने पूर्ण करण्याचा पक्षाचा प्रयत्न राहील, त्यासाठी जनतेने सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. देशातील प्रत्येकाचा विकास करण्यावर काँग्रेसचा भर आहे.आम्ही कोणतीच खोटी आश्वासने देत नाहीत आणि दिलेली आश्वासने पूर्ण करतो, असे सांगत त्यांनी केंद्र सरकारच्या कार्याचा गौरव केला. देशाच्या ऐक्याला बाधा पोहोचवत भाजप देशाला कमकुवत करत असल्याचा आरोप त्यांनी केला. भाजपकडून दिल्या जाणा-या खोट्या आश्वासनांना भुलून न जाता आपल्या सद्सद्विवेक बुद्धीचा वापर करून आणि योग्य निर्णय घेऊन काँग्रेसच्या उमेदवारांना पाठिंबा द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.काँग्रेसच्या नेत्यांनी देशासाठी नेहमीच बलिदान दिले आणि त्याग केला आहे. तर दुसरीकडे भाजप समजांमध्ये तेढ निर्माण करून फुटीरतावादी वृत्तींना खतपाणी घालत आहे, असा आरोप त्यांनी केला. काँग्रेसने देशाची गंगा-जमुना संस्कृती घट्ट केली तर, भाजपने नेहमीच जातीय राजकारण करुन देशाला कमकुवत केल्याचा आरोप सोनियांनी केला. प्रत्येक हातात शक्ती, प्रत्येक हाताची प्रगती यावर आमचा विश्वास असल्याचे सोनियांनी यावेळी सांगितले. आसाम आणि अन्य भागातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी स्वातंत्र्यापूर्वी आणि स्वातंत्र्यानंतरही देशासाठी प्राणांचे बलिदान दिल्याचे सोनियांनी सांगितले. देश घडवण्यावर आमचा विश्वास आहे. भाजप आणि अन्य विरोधी पक्ष त्यावेळी कुठे होते? स्वातंत्र्यापूर्वी आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही त्यांचे काय योगदान आहे? देश, समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचेच काम त्यांनी केले असा आरोप सोनिया यांनी केला. विरोधकांच्या खोट्या प्रचाराला, आश्वासनांना बळी न पडता काँग्रेस उमेदवाराच्या पाठिशी उभे रहाण्याचे सोनियांनी उपस्थितांना आवाहन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


− five = 3