
वॉर्मस्ले (इंग्लंड)- ब्रिटिश भूमीत शनिवारी तिरंगा डौलाने फडकला. ही कमाल भारताच्या महिला क्रिकेटपटूंनी केली. मिथाली राजच्या नेतृत्वाखाली भारताने इंग्लंडविरुद्धची एकमेव कसोटी शनिवारी सहा विकेटनी जिंकली. सलामीवीर स्मृती मंढाना (५१) आणि कर्णधार मिथाली राजची (नाबाद ५०) दमदार फलंदाजी विजयात मोलाची ठरली. भारताचा पुरुष संघासमोर सलग तिस-या पराभवाचे सावट असतानाच दरवर्षी कसोटी खेळणा-या इंग्लंडविरुद्ध भारताच्या महिला त्यांच्याच देशात बाजी मारतात, ही बाब लक्ष वेधून घेते.
मिथाली-शिखाचा संयम
विजयासाठी १८१ धावांचे आव्हान गाठणे, भारतासाठी नक्कीच सोपे नव्हते. मात्र तिस-या दिवसअखेर ४ बाद ११९ धावा करत पाहुण्यांनी विजयाच्या आशा कायम ठेवल्या. अपेक्षेप्रमाणे चौथ्या आणि पाचव्या दिवशी कर्णधार मिथाली राजवरच भारताची सर्वाधिक भिस्त होती. तिने चाहत्यांच्या अपेक्षा पूर्ण करताना शिखा पांडेच्या मदतीने विजयावर शिक्कामोर्तब केले. मिथाली आणि शिखा जोडीने ३४.३ षटके खेळून काढताना पाचव्या विकेटसाठी ६८ धावांची नाबाद भागीदारी केली. कसोटी क्रिकेटमध्ये संयम किती आवश्यक आहे, हे महिला क्रिकेटपटूंनी दाखवून दिले. एकीकडे भारताचे पुरुष फलंदाज खराब फटके मारून बाद होत असतानाच मिथाली-शिखाची संयमी फलंदाजी महिला क्रिकेटचा उंचावलेला दर्जा सिद्ध करते.
मिथालीने विजयावर शिक्कामोर्तब करताच क्षणभर २००६ मधील इंग्लंड दौ-याची आठवण झाली. त्यावेळी मालिकेतील दुस-या आणि अखेरच्या कसोटीत मिथालीने पहिल्या डावात ६५ आणि दुस-या डावात नाबाद २२ धावा करताना मालिका विजयात मोलाचा वाटा वाटा उचलला होता. ‘सिनियर’ मिथाली पुन्हा एकदा संघाच्या मदतीला धावली. शुक्रवारी अखेरच्या सत्रात धोकादायक वाटलेली इंग्लंडची मध्यमगती गोलंदाज केट क्रॉसला शनिवारी यश लाभले नाही. पहिल्या डावात पाच विकेट घेणारी यजमानांची मध्यमगती गोलंदाज जेनी गनचेही मिथाली-शिखा पुढे काहीच चालले नाही.









