
नवी दिल्ली – गेल्या काही वर्षांपासून देशातील वाघांची संख्या रोडावत चालली आहे अशी ओरड सुरु असतानाच वन्यप्रेमी आणि व्याघ्रप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. गेल्या चार वर्षात भारतात वाघांच्या संख्येत तब्बल तीस टक्क्यांनी वाढ झाली आहे. २०१० नंतर भारतातील विविध अभयारण्यातील वाघांची संख्या सुमारे दोन हजार २२६ वर पोहोचली आहे.
२०१४मध्ये करण्यात आलेल्या वाघ्रगणनेचा अहवाल मंगळवारी सादर करण्यात आला. २०१०मध्ये भारतात वाघांची संख्या एक हजार ७०६ इतकी होती. तर २००६ मध्ये भारतात केवळ एक हजार ४११ वाघ होते. वाघांची घटती संख्या लक्षात घेता देशभरात गेल्या काही वर्षात वन्यजीव प्रेमींनी मोठ्या प्रमाणावर वाघ वाचवा मोहीमा हाती घेतल्या होत्या. या मोहीमांना मोठे यश मिळाल्याचे या आकडेवारीवरुन दिसून येत आहे.
‘जगात वाघांची संख्या कमी होत आहे मात्र भारतात ही संख्या वाढत आहे. ही खरंच आनंददायी बाब असल्याचे पर्यावरण मंत्री प्रकाश जवडेकर यांनी सांगितले. जगातील एकूण वाघांच्या संख्येपैकी तब्बल ७० टक्के वाघ भारतात आहे. जेव्हा वाघांची शेवटची गणना करण्यात आली होती त्यावेळी ही संख्या एक हजार ७०६ इतकी होती. नुकत्याच करण्यात आलेल्या वाघ्रगणनेनुसार ही संख्या दोन हजार २२६ पर्यंत पोहोचली आहे. याबाबत आपण अभिमान बाळगला पाहिजे. तब्बल तीस टक्क्यांनी वाघांच्या संख्येत वाढ झाली आहे. ही खरंच भारतासाठी मोठी आनंदाची बाब आहे, असे जावडेकर म्हणाले. कर्नाटक, उत्तराखंड, मध्यप्रदेश, तामिळनाडू आणि केरळ या राज्यांमध्ये वाघांची संख्या वाढत आहे.









