भारताने द.आफ्रिकेविरुद्ध १३० धावांनी मिळवला विजय

Virat Kohli

मेलबर्न – इतिहास हे नेहमी बदलण्यासाठीच असतात हे भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आजच्या सामन्यातून दाखवून दिले. विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध विजयाची परंपरा कायम ठेवणा-या भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धची पराभवाची मालिका अखेर खंडित केली. आजवर विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेविरुद्घ भारत एकही सामना जिंकलेला नाही. मात्र या सामन्यात फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही आघाड्यांवर चमकदार कामगिरी करत भारताने द.आफ्रिकेविरुद्ध १३० धावांनी विजय मिळवला. तर विश्वचषकात सलग दुसरा विजय नोंदवला.
भारताने प्रथम फलंदाजी करत ५० षटकात सात बाद ३०७ धावा केल्या. भारताच्या गोलंदाजीसमोर आफ्रिकेचा संघ ४०.२ षटकात १७७ धावांवर संपुष्टात आला. शिखर धवनची शतकी आणि अजिंक्य रहाणेचे ७९ धावांची तडाखेबाज खेळी भारताच्या विजयात महत्त्वाची ठरली. गेल्या अनेक दिवसांपासून फॉर्मात नसलेल्या शिखर धवनला या सामन्यात सूर गवसला आणि त्याने दमदार १३७ धावांची खेळी साकारली. १४६ चेंडूत त्याने १६ चौकार आणि दोन षटकारांची बरसात करत १३७ धावा केल्या.शिखरचे एकदिवसीय कारकिर्दीतील हे सातवे शतक आहे. त्याला उत्तम साथ दिली ती अजिंक्य रहाणेने. त्याने ६० धावांत ७९ धावा केल्या. यामध्ये सात चौकार आणि तीन षटकारांचा समावेश आहे. या दोघांनी द.आफ्रिकेच्या गोलंदाजांची यथेच्छ धुलाई केली.
प्रत्युत्तरादाखल मैदानात आलेल्‍या दक्षिण आफ्रिकेला दुस-याच षटकात मोहम्‍मद शामीने पहिला धक्का दिला. सलामीचा फलंदाज क्विंटन डी कॉकला अवघ्या सात धावांवर विराटकडे झेल देऊन बाद केले. दक्षिण आफ्रिका एक बाद १२ धावा अशी स्थिती असताना मैदानात उतरलेल्या हाशिम आमला याला मोहित शर्माने बाद केले. त्याने २२ धावा केल्या. त्यानंतर कर्णधार एबी डिविलिअर्स आणि फाफ ड्यु प्‍लेसिसने दक्षिण आफ्रिकेचा डाव सावरण्‍याचा प्रयत्‍न केला. मात्र, मोहित शर्माच्‍या अप्रतिम थ्रोवर धोनीने एबीला बाद केले. डिविलियअर्सने ३८ चेंडूंत तीन चौकारांच्‍या मदतीने ३० धावा केल्‍या. पाठोपाठ अर्धशतक करणा-या फा डू प्लेसिसला बाद करुन मोहित शर्माने आफ्रिकेला चौथा धक्का दिला. प्लेसिस बाद झाल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा डाव गडगडला. ठराविक अंतराने द. आफ्रिकेचे फलंदाज बाद होत गेले. अखेर ४०.२ षटकात १७७ धावांतच द.आफ्रिकेचा डाव संपुष्टात आला. फिरकीपटू आर.अश्विनने सर्वाधिक तीन गडी बाद केले.
तत्पूर्वी, भारताने सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. सामन्याला सुरुवात झाल्यानंतर भारत नऊ धावांवर असताना रोहित शर्माच्या रुपाने दक्षिण आफ्रिकेला पहिले यश मिळाले. रोहित शर्मा भोपळा न फोडता माघारी परतला. त्यानंतर शिखर आणि विराटने डावाला आकार देण्यास सुरवात केली. विराटने शिखरच्या साथीने दुस-या विकेटसाठी महत्त्वपूर्ण १२७ धावांची भागीदारी साकारली. अर्धशतकासाठी चार धावा बाकी असताना विराट इम्रान ताहिरच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला.विराट कोहली ४६ धावांवर बाद झाला.
त्यानंतर धवन आणि अजिंक्य रहाणेची जोडी मैदानावर जमली. या दोघांनी तिस-या विकेटसाठी १२५ धावांची भागीदारी केली. तर भारताचा सलामीवीर शिखर धवनने दमदार शतक झळकावले. १२२ चेंडूत त्याने हे शतक साकारले. शिखर १३७ धावांवर बाद झाला. शिखर बाद झाल्यानंतर मात्र भारताचा डाव कोसळला. अखेरच्या ६.३ षटकात भारताने केवळ ४६ धावा करत पाच गडी गमावले. शिखरपाठोपाठ रैना केवळ सहा धावा करुन बाद झाला. त्यानंतर ७९ धावांची खेळी करत रहाणेही बाद झाला. कर्णधार महेंद्रसिंग धोनी या सामन्यात पुन्हा एकदा अपयशी ठरला. त्याने १८ धावा केल्या. भारताने ५० षटकात सात गड्यांच्या मोबदल्यात ३०७ धावा केल्या. द. आफ्रिकेच्या मॉर्केलने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या.
संक्षिप्त धावफलक
भारत – सात बाद ३०७(५०) विजयी शिखर धवन(१३७), अजिंक्य रहाणे(७९),विराट कोहली(४६)
द.आफ्रिका – सर्वबाद १७७(४०.२), फाफ ड्यु प्‍लेसिस(५५),
सामनावीर – शिखर धवन(१३७)

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


+ eight = 13