भारताला कसोटी अनिर्णित राखण्यात यश

AP1_10_2015_000028B
सिडनी – अजिंक्य रहाणे (८८ चेंडूत नाबाद ३८ धावा) आणि भुवनेश्वर कुमार (३० चेंडूंत नाबाद २० धावा) यांनी अखेरची १२ षटके खेळून काढली आणि भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्धची चौथी आणि अंतिम कसोटी अनिर्णित राखता आली. याबरोबरच चार कसोटींच्या मालिकेत २-० मालिका विजयावरच ऑस्ट्रेलियाला समाधान मानावे लागले. कसोटीतील नवीन कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताची सुरुवात चांगली झाली.
मात्र चहापानानंतरचे अखेरचे सत्र खेळून काढणे भारतासाठी सोपे नव्हते. चहापानाला भारताच्या २ बाद १६० धावा होत्या. त्यावेळी मुरली विजय आणि विराट कोहली हे स्थिरावलेले फलंदाज मैदानावर होते. अर्थातच चहापानानंतर म्हणजे ३३ षटकांत विजयासाठी १८९ धावांची गरज होती. अर्थातच विजयला मिळालेल्या दोन जिवदानांचा येथे उल्लेख करायला हवा. तो ४२ धावांवर असताना रायन हॅरिसच्या गोलंदाजीवर शॉर्ट कव्हरला शॉन मार्शने त्याचा झेल सोडला. पाठोपाठ ४६ धावांवर खेळताना तो पायचीत असल्याचे टीव्ही रिप्लेमध्ये स्पष्ट दिसत होते. मात्र पंच रिचर्ड केटलबॉरो यांनी विजयला नाबाद दिले. त्याचा फायदा घेत विजयने आक्रमक फटकेबाजी करायला सुरुवात केली. त्यावेळी भारत विजयासाठी प्रयत्न करणार असेच चित्र निर्माण झाले होते. मात्र चहापानानंतरच्या चौथ्याच षटकात वेगवान गोलंदाज हॅझेलवुडने धोकादायक मुरली विजयला (८०) बाद केले. विजय-कोहली यांची तिस-या विकेटसाठी ७४ धावांची भागीदारी होती. कोहलीच्या जोडीला आता फॉर्मात असलेला अजिंक्य रहाणे आला. मात्र कोहलीला स्टार्कने ४६ धावांवर बाद केले.
कोहली बाद झाल्यानंतर आता कसोटी वाचवण्याचेच आव्हान भारतासमोर होते. मात्र तो प्रवास सोपा नव्हता. कारण फॉर्मात आलेल्या स्टार्कने त्याच्या पुढच्याच षटकात सुरेश रैनाला (०) बाद केले. पहिल्या डावाप्रमाणे दुस-या डावातही रैना भोपळाही फोडू शकला नाही. ऑगस्ट २०१२ नंतर झालेल्या कसोटी पुनरागमनात तो सपशेल अपयशी ठरला. ५ बाद २०३ यास्थितीत पहिल्या अ‍ॅडलेड कसोटीच्याच आठवणी येऊ लागल्या. त्यावेळी देखील पाचव्या दिवशी चहापानानंतर अखेरच्या सत्रात भारताने विकेट गमावल्या आणि कसोटीही गमावली होती. त्यात भर पडली ती वृद्धिमान सहाची. नॅथन लियॉनने अप्रतिम ऑफस्पिनवर सहाला (०) पायचीत पकडले. मात्र एकाबाजूला उभ्या असलेल्या रहाणेला ‘टेलएंडर’ (शेवटच्या फलंदाजांकडून) रवीचंद्रन अश्विन आणि भुवनेश्वर कुमार यांची साथ मिळेल हीच आशा होता. मात्र अश्विन सात षटकेच मैदानावर टिकला. त्याला अवघ्या एका धावेवार हॅझेलवुडने तंबूचा रस्ता दाखवला. ७ बाद २१७ यास्थितीत अखेरची १२ षटके खेळून काढायची होती. मात्र रहाणेने जबाबदारीने खेळ करत भुवनेश्वरसह भारताला कसोटी अनिर्णित राखून दिली. दुसरीकडे रहाणे-भुवनेश्वर किल्ला लढवत असताना स्मिथ हार मानायला तयार नव्हता. लियॉनच्या फिरकीवर तर रहाणे-भुवनेश्वरच्या अवतीभोवती सात क्षेत्ररक्षक उभे होते. मात्र यजमानांना त्याचा फायदा झाला नाही.
तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाने शुक्रवारच्याच धावसंख्येवर म्हणजे ६ बाद २५१ धावांवर डाव घोषित केला. याबरोबरच ९० षटकांत विजयासाठी ३४९ धावांचे लक्ष्य स्मिथ आणि सहका-यांनी भारतासमोर ठेवले होते. मात्र लोकेश राहुल आणि विजय यांनी सावध सुरुवात केली. या दोघांनी पहिल्या सात षटकांत अवघ्या ९ धावाच केल्या. तेव्हा भारत ही कसोटी अनिर्णित राखण्याच्यादिशेनेच खेळणार हे चित्र स्पष्ट झाले होते. त्यातच ऑफस्पिनर लियॉनलादेखील सहाव्याच षटकात गोलंदाजीसाठी आणण्यात आले. पहिल्या डावातील शतकवीर राहुल थोडाफार चाचपडत होता. अखेर १६ धावा केल्यावर लियॉनच्या गोलंदाजीवर तो बॅकवर्ड शॉर्ट लेगला वॉर्नरकडे झेल देऊन बाद झाला. पाठोपाठ आलेला रोहित शर्मा पहिल्याच चेंडूवर बाद होताना वाचला.
मला पराभवाचा तिरस्कार वाटतो. आम्ही चुरस ही दिलीच पाहिजे तरच प्रतिस्पर्धी तुमचा मान राखतात. त्याप्रमाणे आम्ही ऑस्ट्रेलियाला या मालिकेत चांगलीच चुरस दिली. अ‍ॅडलेडमधील पहिल्या कसोटीप्रमाणे येथेदेखील विजयाची संधी होती. मात्र ऑस्ट्रेलियाने दडपणात आणले. फिल ह्युज घटनेनंतर ऑस्ट्रेलिया ज्याप्रकारे खेळली ते कौतुकास्पद आहे. चहापानानंतर विजयी लक्ष्य गाठण्याचा प्रयत्न करायचा की नाही याबाबत मला १०० टक्के खात्री नव्हती. मात्र भारताने दिलेली झुंज कौतुकास्पद आहे. लोकेश राहुलचे कौतुक करायला हवे. ऑस्ट्रेलियात त्याने पदार्पणानंतर दुसरीच कसोटी खेळताना शतक केले ही सोपी बाब नाही.     – विराट कोहली
सिडनी कसोटी जिंकता आली नसली तरी मालिका विजयाचा आनंद आहे. या कसोटीत पाचव्या दिवशी आम्हाला अपेक्षित बाउन्स मिळाला नाही. मात्र अनिर्णित राखण्यात यशस्वी झाल्याबद्दल भारताला श्रेय द्यायला हवे. त्यात मला देखील मालिकेत चार शतके करता आली. कर्णधारपदही भूषवता आले. – स्टीवन स्मिथ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


six × 7 =