ऑकलंड – गोलंदाजांच्या भन्नाट कामगिरीमुळे भारताला न्यूझीलंड विरुध्द सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात विजयाची संधी निर्माण झाली आहे. न्यूझीलंडच्या ४०७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, तिस-या दिवसअखेर भारताच्या एक बाद ८७ धावा झाल्या आहेत.
भारताला विजयासाठी अजून ३२० धावांची आवश्यकता असून, भारताचे नऊ फलंदाज शिल्लक आहेत. शिखर धवन (४९) आणि चेतेश्वर पूजारा (२२) धावांवर खेळत आहे. मुरली विजयला (१३) धावांवर साऊथीने वॅटलिंगकडे झेल द्यायला भाग पाडले.तत्पूर्वी भारताच्या वेगवान गोलंदाजांनी दुस-या डावात न्यूझीलंडची दैना उडवून दिली. झहीर, इशांत आमि मोहोम्मद शामीच्या भेदक मा-यासमोर न्यूझीलंडचा डाव फक्त १०५ धावात आटोपला.पहिल्या डावातील ३०१ धावांच्या आघाडीच्या जोरावर न्यूझीलंडने भारतासमोर विजयासाठी ४०७ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. दुस-या डावात मोहोम्मद शामी, इशांत शर्मा आणि झहीर खानच्या भेदक गोलंदाजीसमोर न्यूझीलंडच्या फलंदाजांनी गुडघे टेकले. शामी आणि इशांतने प्रत्येकी तीन तर झहीरने दोन गडी बाद केले.दुस-या डावात रॉस टेलरचा अपवाद वगळता सर्व फलंदाज अपयशी ठरले. रॉस टेलरने सर्वाधिक ४१ धावा केल्या. तत्पूर्वी शनिवारच्या खेळाला सुरुवात झाल्यानंतर भारताचा पहिला डाव २०२ धावांवर आटोपला. कालच्या धावसंख्येत भारताच्या उर्वरित सहा फलंदाजांनी फक्त ७२ धावांची भर घातली.शुक्रवारी भारताचा डाव सावरुन आशा निर्माण करणारी रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणेची जोडी झटपट तंबूत परतली. रोहित (७२) आणि अजिंक्य (२६) धावांवर बाद झाले. हे दोघे बाद झाल्यानंतर कर्णधार ढोणीसह अन्य फलंदाजांनी निराशा केली. रविंद्र जाडेजा (३०) धावांवर नाबाद राहिला.न्यूझीलंडकडून वागनेरने सर्वाधिक चार, साऊथी आणि बाउल्टने प्रत्येकी दोन गडी बाद केले. कसोटीचे अजून दोन दिवस शिल्लक असून, गोलंदाजांनी आपली कामगिरी चोख बजावल्यानंतर भारताच्या विजयाची सर्व मदार आता फलंदाजांवर अवलंबून आहे.









