काबूल- अफगाणिस्तानातील हेरात प्रांतातील भारतीय दूतावासावर हल्ला करणा-या चारही दहशतवाद्यांना ठार मारल्याचे आयटीबीपीचे प्रमूख सुभाष गोस्वामी यांनी सांगितले.
पश्चिम अफगाणिस्तानातील हेरात प्रांतातील भारतीय दूतावासावर चार सशस्त्र दहशतवाद्यांनी शुक्रवारी सकाळी हल्ला केला. या चारही जणांना ठार मारल्याचे इंडो- तिबेटन सीमा दल (आयटीबीपी) प्रमूख सुभाष गोस्वामी यांनी सांगितले. यातील एका दहशतवाद्याला आयटीबीपी आणि तीन दहशतवाद्यांना अफगाणिस्तानच्या जवानांनी ठार मारले.
भारतीय दूतावासातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी सुरक्षित असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयातील अधिका-यांनी दिली. तसेच काबूल येथील दूतावास आणि जलालाबाद येथील वकिलातीत बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. तर मझर ए शरीफ आणि खंदहार या भागातही चोख सुरक्षा ठेवण्यात आली असून या भागात हाय अलर्ट जारी करण्यात आले आहे. भारत सरकार अफगाणिस्तानच्या संपर्कात असून, परराष्ट्र सचिव सुजाता सिंग परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने दिली.









