
अॅडिलेड, दि. १५ – वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या सलामीच्या सामन्यात विराट कोहलीचे शतक, रैना व धवन या डावखु-या फलंदाजांच्या अर्धशतकाच्या आधारे भारताने ५० षटकांत सात गडी गमावत ३०० धावांचा पल्ला गाठला. चांगली सुरुवात होऊनही शेवटच्या षटकांमध्ये भारतीय फलंदाजी कोसळल्याने भारताला मोठी धावसंख्या उभारता आली नाही.
वर्ल्डकपमध्ये भारताची सलामीची लढत कट्टर प्रतिस्पर्धी समजल्या जाणा-या पाकिस्तानसोबत सुरु आहे. नाणेफेक जिंकून कर्णधार महेंद्रसिंग धोनीने पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. शिखर धवन आणि रोहित शर्मा ही जोडी सलामीला आली. भारताच्या २४ धावा झाल्या असताना भारताची सलामीची जोडी फोडण्यात पाकच्या गोलंदाजांना यश आले. रोहित शर्मा १५ धावांवर बाद झाला. यानंतर फलंदाजीला आलेल्या विराट कोहलीने संयमी खेळी करत भारताचा डाव पुढे नेला. धवन – कोहली जोडीने मोठे फटके मारण्याऐवजी एकेरी धावा करत भारताचा फलक हलता ठेवला. खेळपट्टीवर स्थिरावताच या दोघांनीही फटकेबाजीला सुरुवात केली. शिखर धवन ७३ धावांवर असताना चोरटी धाव घेण्याच्या नादात बाद झाला. धवन – कोहली जोडीने १२९ धावांची भागीदारी केली. यानंतर विराट कोहलीने रैनाच्या मदतीने भारताला दोनशेचा टप्पा गाठून दिला. कोहलीच्या शतकानंतर सुरेश रैनानेही अर्धशतक ठोकले. कोहली १०८ आणि रैना ७२ धावांवर बाद झाला तेव्हा भारताची स्थिती ४७.३ षटकांत ४ बाद २८४ अशी होती. त्यानंतर पाकिस्तानच्या गोलंदाजांचा अचूक मा-यासमोर भारतीय फलंदाजांनी शरणागती पत्कारली. कर्णधार महेंद्रसिंग धोनी १८, रविंद्र जडेजा ३ आणि अजिंक्य रहाणे भोपळा न फोडताच माघारी परतला. लागोपाठ तीन फलंदाज बाद झाल्याने भारताने ५० षटकांत सात गडी गमावत ३०० धावाच केल्या. शेवटच्या पाच षटकांत भारताने फक्त २१ धावा केल्या. पाकिस्तानतर्फे सोहेल खानने १० षटकांत ५५ धावा देऊन ५ विकेट घेतल्या. तर वहाब रियाजने एक विकेट घेतली.









