मतदान करण्यासाठी निवडणूक आयोगाकडून आमंत्रण

voting-machine1000

नवी दिल्ली- प्रत्येक मतदाराने मतदान करावे यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाबरोबरच प्रत्येक राज्यातील आणि जिल्ह्यातील निवडणूक अधिकारी प्रयत्न करत आहेत. यासाठी मतदारांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम आयोगाने हाती घेतले आहेत. यामध्ये आता एका नाविन्य पूर्ण उपक्रमाची भर पडली आहे. मध्य प्रदेशमधील काही मतदारांना खुद्द निवडणूक अधिका-याने मतदानासाठीचे आमंत्रण पाठवले आहे.
मध्य प्रदेशमधील शिवनी जिल्ह्यात दहा एप्रिल रोजी मतदान होत आहे. यासाठी समीरा बेगम यांना मतदान करण्यासाठी निवडणूक आयोगाकडून आमंत्रण आले आहे. या पत्रात मतदान करणे किती महत्त्वाचे आहे हे सांगण्यात आले आहे. याआधी मी कधीच मतदान केले नव्हते. मात्र यंदा मी नक्की मतदान करणार असल्याचे समीरा यांनी सांगितले.
शिवनी जिल्ह्याला स्वतःचा असा लोकसभा मतदारसंघ नाही. या जिल्ह्यातील विधानसभेचे चार मतदारसंघ मंडला आणि बालाघाट जिल्ह्यांत विभागले आहेत. जिल्ह्यातील अनेक मतदारांना अशा प्रकारचे आमंत्रण पाठवण्यात आले आहे. अर्थात हे आमंत्रण फक्त एक कागद नाही. ज्याप्रमाणे एखाद्याला लग्नपत्रिका पाठवली जाते त्याप्रमाणेच समीरा बेगम यांच्यासारख्या अनेक मतदारांना आमंत्रण पाठवण्यात आल्याचे जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियानका दास यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीच्या इतिहासात प्रथमच जिल्हापातळीवर मतदान करण्यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीसाठी सिस्टमॅटिक वोटर्स एज्युकेशन अँड एलेक्टोरल पार्टिसिपेशन(एसव्हिईईपी) अभियान सुरु केले आहे. यात प्रामुख्याने महिला, नवे मतदार आणि ग्रामिण भागातील मतदारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला जात आहे. या अभियानाअंतर्गत मतदारांचे अधिकार, मतदार ज्या ठिकाणी राहतात तेथील जवळचे मतदान केंद्र, मतदानाची तारीख आणि वेळ आदींची माहिती दिली जाते. त्याचबरोबर मतदारांना त्यांचे ओळखपत्र देणे, ‘नोटा’ (उमेदवार नाकारण्याचा अधिकार) याची ओळख करुन दिली जाते. ‘एसव्हीईईपी’ हा उपक्रम २०१०च्या विधानसभा निडणुकीमध्ये सर्वप्रथम राबवण्यात आला होता. गेल्या तीन वर्षांमध्ये या उपक्रमाला मोठे यश मिळाल्याचे निवडणूक अधिका-यांनी सांगितले. यामुळे विधानसभा निवडणुकीत १० ते ३५ टक्क्यांपर्यंत मतदानाची टक्केवारी वाढली आहे. विशेष म्हणजे यात महिला आणि युवकांचा अधिक समावेश असल्याचे अधिका-यांनी सांगितले. खुद्द शिवनी जिल्ह्यात २०१३मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी पाच टक्क्यांनी वाढली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


× four = 16