यवतमाळ, दि. १८ : जिल्ह्यातील दारव्हा येथील पाणी पुरवठ्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी वितरण व्यवस्थेसह नवीन पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव शासनास सादर करण्यात आला आहे. अडाण प्रकल्पावर आधारीत या योजनेला गती देण्यासोबत अस्तित्वास असलेली पाणी पुरवठा योजना सुरळीत सुरू ठेवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी सांगितले. श्री.राठोड यांनी यवतमाळ जिल्ह्यातील विविध विकास कामे तसेच प्रलंबित कामांचा आढावा नागपूर येथील रविभवनात आयोजित बैठकीत घेतला. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी डॅा.शरद कुळकर्णी, पोलिस अधिक्षक संजय दराडे, विज वितरणचे अधिक्षक अभियंता बाबासाहेब जाधव, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गायकवाड यांच्यासह जिल्ह्यातील सर्व विभागप्रमुख अधिकारी उपस्थित होते.
दारव्हा येथील प्रस्तावित योजना 41 किमी अंतराची असून अडाण प्रकल्पावर ती आधारीत आहे. योजनेला तांत्रिक मान्यता प्राप्त झाली असून सुजल निर्मल अभियानांतर्गत सदर योजना घेण्यात आली आहे. या योजनेला शासनस्तरावर गती देण्यासाठी मुंबई येथे स्वतंत्र बैठक बोलाविली जाणार असल्याचे श्री.राठोड म्हणाले. दारव्हा येथील योजनेसह प्रस्तावित प्रशासकीय ईमारत, वणी येथील बाजार गाळे,नेर येथील वळण रस्ता, हरसूल-वनोली-मोरखेड रस्ता तसेच वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वेमार्गाच्या भूसंपादनाचा आढावाही त्यांनी घेतला. नेर येथे प्रशासकीय तथा पोलिस स्टेशनच्या ईमारतीसाठी प्रस्ताव सादर करण्याची सुचना त्यांनी केली. दारव्हा येथे मागासवर्गीय मुला-मुलींच्या वसतीगृहासाठी शासकीय जागा उपलब्ध नसल्यास बाजार भावाने जागा खरेदी करण्याची कार्यवाही करण्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील रस्त्यांची स्थिती, अंगणवाडीचे बांधकाम, चारा टंचाई, दृष्काळस्थिती, सिंचन आदींचा आढावाही त्यांनी घेतला.










