
चालकाच्या सावधगिरीने २१ जणाचे वाचले प्राण
नेर (यवतमाळ) – आगारातील भंगार बसचा फटका येथील प्रवाशांना बसला असून, चालकाच्या सावधगिरीने २१ जणाचे प्राण वाचल्याची घटना आज रविवारी घडली. या घटनेतून एसटी प्रशासनाने बोध घेण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे.
आगारातील एम. एच. २० डी ८६१६ क्रमांकाची बस आज नेहमीप्रमाणे प्रवाशी घेवून कामरगाव येथे गेली. प्रवासी घेवून परतत असताना, खरडगाव जवळील पुलाजवळ बसच्या टायरचे एक्सल तुटले. व चालकाचे बस वरील नियंत्रण सुटून बस शेतात शिरली. बस पलटी होत असताना चालकाच्या सतर्कतेमुळे २१ प्रवाशांचे प्राण वाचले. आगारातील अनेक बसेस भंगार अवस्थेतील असून, खिळखिळ््या बसेसमुळे अपघाताची शक्यता असताना एसटी प्रशासनाने गंभिरतेने घेतले नाही. आज घडलेल्या अपघातातून प्रशासनाने बोध घेवून भंगार बसेस बंद कराव्या अशी मागणी संजय ठाकरे, नितीन मोहरकर, नितीन चव्हाण आदींनी केली आहे.









