
मुंबई – लोकसभा निवडणुकीतील रंगत दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. मतदानाच्या एकूण नऊ टप्प्यांपैकी चार टप्प्यातील मतदान पार पडले आहे. या निवडणुकीत राज्यातील ७.८९ कोटी मतदारांपैकी १०.७ लाख मतदार हे १८ ते १९ या वयोगटातील असून पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
४८ लोकसभा मतदारसंघ असलेल्या महाराष्ट्रातील विदर्भात मतदानाचा पहिला टप्पा पार पडला असून मोठ्या प्रमाणात लोकांनी मतदानाचा अधिकार बजावला. १.६६ कोटी लोकांपैकी सुमारे ६० टक्के लोकांनी मतदान केले.राज्यातील १९ मतदारसंघांमध्ये १७ एप्रिलला दुस-या टप्प्यातील मतदान होणार आहे. केंद्रीय गृह मंत्री सुशीलकुमार शिंदे(सोलापूर), भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे(बीड), माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण(नांदेड) आणि केंद्रीय मंत्री प्रतिक पाटील(सांगली) या नेत्यांमध्ये जोरदार लढत होणार आहे. राज्यातील तिस-या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान २४ एप्रिलला होणार आहे. मुंबई, ठाणे, रायगड, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा अशा १९ मतदारंसघामध्ये मतदान होणार आहे. राज्यात एकूण सात कोटी ८९ लाख ६६ हजार ६४२ मतदारांपैकी १० लाख ७५ हजार ३७६ मतदार हे १८ ते १९ या वयोगटातील आहेत.









