
नवी दिल्ली – छत्तीसगडच्या सुकमा जिल्हयातील जंगलामध्ये केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) गस्तीपथकावर मंगळवारी माओवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात वीस जवान शहीद झाले आहेत.
मंगळवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास जेराम नुल्लाह भागात माओवाद्यांच्या एका मोठया गटाने घात लावून पोलिस आणि सीआरपीएफच्या पन्नास जणांच्या संयुक्त तुकडीवर हल्ला केला. हा भाग टोंगापाल पोलिस स्थानकाच्या हद्दीत येतो.सीआरपीएफचे पंधरा आणि राज्य पोलिसांचे पाच जवान या हल्ल्यात शहीद झाल्याचे अतिरिक्त पोलिस महासंचालक मुकेश गुप्ता यांनी सांगितले. एप्रिल २०१० मध्ये याच भागात माओवाद्यांनी पोलिसांवर घात लावून हल्ला केला होता. या हल्ल्यात ७६ पोलिस शहीद झाले होते.सीआरपीएफचे तीस आणि राज्य पोलिसांचे चौदा असे ४४ जणांचे पथक गस्तीवर होते. माओवाद्यांनी आधी सुरुंग स्फोट केला त्यानंतर जवानांच्या दिशेने बेछूट गोळीबार सुरु केला. छत्तीसग़ड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अजूनही या भागामध्ये माओवादी आणि सुरक्षापथकांमध्ये जोरदार चकमक सुरु आहे.तेथे लढणा-या जवानांच्या मदतीसाठी जगदालपूर आणि रायपूरमधुन येथून दोन हॅलिकॉप्टरमधुन अतिरिक्त कुमक पाठवण्यात आली आहे. छत्तीसगडच्या काँग्रेस नेत्यांवर ज्या जिराम घाटीमध्ये हल्ला झाला होता त्या ठिकाणापासून काही अंतरावर ही चकमक सुरु आहे.









