
श्रीनगर – जम्मू-काश्मीरमधील माचिल बनावट चकमकप्रकरणी लष्कराने दोन अधिका-यांसह सात जवानांना दोषी ठरवले आहे. या सात दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
३० एप्रिल २०१० मध्ये जम्मू-काश्मीरमधील माचिल येथे तीन घुसखोरांना ठार मारल्याचा दावा लष्कराने केला होता. हे तीनही घुसखोर पाकिस्तानी दहशतवादी असल्याचेही लष्कराकडून सांगण्यात आले होते. मात्र महम्मद शाफी, शहजाद अहमद आणि रियाझ अहमद हे तिघेही बारामुल्ला जिल्ह्यातील नंदीहाल भागातील नागरिक असल्याचे तपासादरम्यान आढळले होते.
चकमकीत मृत्युमुखी पडलेल्या या तिघांचे नोकरीचे अमिष दाखवून अपहरण करण्यात आले आणि कुपवाडाजवळील ताबारेषेवरील चकमकीत ठार मारल्याचा आरोप या अधिका-यांवर ठेवण्यात आला होता. त्यानंतर जानेवारी २०१४ मध्ये लष्कराच्या आदेशानंतर या प्रकरणातील आरोपींवर कोर्ट मार्शल कारवाई करण्यात आली होती. या कारवाईत सात जवान, दोन नागरिक आणि एक प्रादेशिक जवान दोषी आढळले होते. माचिल येथील बनावट चकमकीनंतर काश्मीरमध्ये या घटनेचे हिंसक प्रतिसाद उमटले होते. काश्मीरमध्ये दोन महिने याविरोधात आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनात १२३ नागरिकांचा मृत्यू झाला होता.









