
नवी दिल्ली – भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान समजला जाणाऱ्या ‘भारतरत्न’ पुरस्काराची आज घोषणा करण्यात आली. हिंदू महासभेचे नेते, काँग्रेसचे माजी अध्यक्ष व बनारस हिंदू विद्यापीठाचे संस्थापक पंडित मदनमोहन मालवीय (मरणोत्तर) व माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना हा सन्मान जाहीर झाला आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून ही माहिती देण्यात आली. येत्या २६ जानेवारी रोजी हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत वाजपेयी व मालवीय यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. सरकारचा हा निर्णय राष्ट्रपती मुखर्जी यांना कळविण्यात आला. त्यानंतर ‘मालवीय व वाजपेयी यांना भारतरत्न जाहीर करताना मला आनंद होत आहे’ असे ट्वीट राष्ट्रपतींच्या ट्विटर अकाउंटवरून करण्यात आले.
केंद्रात भाजपची सत्ता आल्यानंतर मदनमोहन मालवीय यांना ‘भारतरत्न’ देण्याचे आश्वासन खुद्द नरेंद्र मोदी यांनी प्रचारादरम्यान दिले होते. त्यामुळे हे नाव निश्चितच मानले जात होते. मालवीय यांच्यासोबत वाजपेयी यांनाही सर्वोच्च पुरस्काराने गौरविले जावे, अशी मागणी होती होती. बहुतांश राजकीय पक्षांनीही वाजपेयी यांच्या नावास पाठिंबा दर्शवला होता. त्याची योग्य दखल मोदी सरकारने घेतली.वाजपेयी व मालवीय या दोघांचाही उद्या, २५ डिसेंबर रोजी जन्मदिवस आहे. हा दिवस ‘गुड गव्हर्नन्स डे’ म्हणून साजरा करण्याची घोषणा सरकारने याआधीच केली आहे. त्या पार्श्वभूमीवर ‘भारतरत्न’ची झालेली घोषणा महत्त्वपूर्ण मानली जात आहे. आजवर देशातील ४३ महनीय व्यक्तींना ‘भारतरत्न’ने गौरविण्यात आले आहे. आता वाजपेयी व मालवीय यांचे नावही या मानकऱ्यांच्या यादीत जोडले गेले आहे.









