
मुंबई – मुंबईत दुपारपासून पावसाचा जोर वाढलेला असताना येत्या २४ तासांत अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या आपत्कालिन व्यवस्थापन विभागासह सर्व यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. दरम्यान, ठाणे जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे सुर्या आणि वैतरणा नद्यांना पूर आला असून पूरात दोघे जण वाहून गेल्याचे सांगण्यात येत आहे.
भारतीय हवामान खात्याच्या विभागीय केंद्राने जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करताना मुंबईला सतर्क राहण्याची सूचना दिली आहे. बंगालच्या खाडीत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने हवामानात मोठे बदल झाले असून महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या किनारपट्टी भागाला अतिवृष्टीचा तडाखा बसू शकतो, असे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे.
मुंबईत येत्या २४ तासांत ७ ते १४ सेंटीमीटर पाऊस कोसळेल तर हेच प्रमाण ठाणे जिल्ह्यासह कोकणात २४ सेंटीमीटरपर्यंत जाऊ शकतो, असे आयएमडीचे मुंबईतील संचालक व्ही. के. राजीव यांनी सांगितले. गेल्या २४ तासांत सांताक्रूझमध्ये ४८.३ मिलीमीटर तर कुलाब्यात २६.६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.









