
पिंपरीत शेतकऱ्याच्या घरी भोजन व मुक्काम
यवतमाळ, दि. 4 : शेतकरी आत्महत्येमागील नेमक्या कारणांचा शोध घेवून या समस्येवर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यवतमाळ जिल्ह्यातील तीन गावांना भेटी देवून गावकऱ्यांशी मनमोकळा संवाद साधला. यवतमाळ पासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या रातचांदणा व घोडखींडी येथील शेतकऱ्यांशी चर्चा केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी 1600 लोकसंख्येच्या पिंपरी बुटी येथील शेतकरी विधवा महिलांशी संवाद साधला. त्यानंतर तेथीलच विष्णुजी रंगराव ढुमणे या शेतकऱ्याकडे भोजन घेवून यांनी मुक्काम केले.
या भेटीत मुख्यमंत्र्यांसोबत पालकमंत्री संजय राठोड, आ.मदन येरावार, आ.डॅा.अशोक ऊईके, आ.राजु नजरधने तसेच प्रधान सचिव प्रविण परदेशी, आयुक्त ज्ञानेश्वर राजुरकर, जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी डॅा.मल्लिनाथ कलशेट्टी, पोलिस अधिक्षक संजय दराडे यांनीही या गावात रात्र घालविली. मुख्यमंत्र्यांनी वेगवेगळ्या गावांना दिलेल्या भेटीप्रसंगीही हे सर्व मान्यवर उपस्थित होते. यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक आत्महत्या झाल्या आहे. त्यामुळे येथील आत्महत्या थांबविण्यासोबतच त्यामागील कारणांचा नेमका शोध घेण्यासाठी यवतमाळ येथे चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. चर्चासत्रानंतर मुख्यमंत्र्यांनी सायंकाळी 8 वाजता थेट रातचांदणा हे गाव गाठले. त्यानंतर काही अंतरावर असलेल्या घोडखिंडी व नंतर पिंपरी बुटी येथील शेतकऱ्यांशी मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला.
शेतकऱ्यांची स्थिती वाईट आहे. वारंवार शेतकऱ्यांना दुष्काळाचा सामना करावा लागतो. अशा स्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला जात आहे. सिंचनाच्या सोयी उपलब्ध करुन दिल्याशिवाय पर्याय नाही. त्यासाठी दिर्घकालीन उपाययोजना राबविण्यात येत आहे. परंतु तात्काळ दिलासा देण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान हाती घेण्यात आले असून या अभियानातुन शेतकऱ्यांना शाश्वत सिंचन सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहे. येत्या जुन अखेर पर्यंत याचे चांगले परिणाम दिसून येतील, असे मुख्यमंत्री शेतकऱ्यांशी संवाद साधतांना म्हणाले.
गेल्या काही वर्षांमध्ये पाहीजे त्या प्रमाणात सिंचन विहीरींची कामे झाली नाहीत. येत्या जुन पर्यंत प्रलंबीत सर्व विहीरी पुर्ण करण्यात येणार आहे. शिवाय या विहीरींना विज कनेक्शन दिले जातील. शेतकऱ्यांनी खचुन न जाता खंबीपणे उभे राहावे. शासन पुर्ण ताकदीनीशी पाठीशी उभे आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
पिंपरी बुटी येथे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी जिल्हा परिषदेच्या शाळेत शेतकऱ्यांच्या विधवा महिलांशी चर्चा करुन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी महिलांनीही आपल्या अडीअडचणी विषद केल्या. विधवा महिलांच्या समस्या प्राधान्याने सोडविण्याचा प्रयत्न आहे, असे सांगूण मुख्यमंत्र्यांनी सर्वच महिलांना धीर देत त्यांच्याशी चर्चा केली. या गावात रात्री 11 पर्यंत मुख्यमंत्र्यांनी गावकऱ्यांची निवेदने स्विकारुन चर्चा केली.
पिंपरी बुटी हे यवतमाळ पासून 22 किलोंमीटर अंतरावर असलेले 1600 लोकसंख्येचे गाव आहे. गावकऱ्यांशी चर्चा आटोपल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी शेतकरी विष्णूजी रंगराव ढुमणे यांच्या घरी पालकमंत्री संजय राठोड व आ. मदन येरावार यांच्यासोबत भोजन घेतले. मुख्यमंत्र्यांच्या बाजूस शेतकरी विष्णूजी ढोमणे बसले होते. भोजन आटोपल्यानंतर सर्वांनी श्री. ढोमणे यांच्याकडेच मुक्काम केला. ढोमणे यांच्याकडे 13 एकर कोरडवाहु शेती आहे. त्यात ते कापुस व सोयाबिन पिके घेतात. अन्य आमदार तथा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गावात वेगवेगळ्या ठिकाणी मुक्काम केले. दुसऱ्या दिवशी स्वच्छ भारत अभियानांतर्गत शौचालय बांधकामाचे भूमिपूजन केल्यानंतर मुख्यमंत्री परभणीकडे रवाना झाले.
मुख्यमंत्र्यांचे भरीत, भाकरीचे साधे जेवण
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरी बुटी येथील मुक्कामात श्री. ढोमणे यांच्याघरी भरीत, भाकरीचे जेवण घेतले. जमिनीवर पंगतीत बसून त्यांनी साध्या भोजनाचा आस्वाद घेतला. त्यांच्या बाजूला शेतकरी श्री.ढोमणे तर दुसऱ्या बाजूला पालकमंत्री संजय राठोड तसेच आ.राजु नजरधने, आ.डॅा.अशोक उईके बसले होते. भरीत, भाकरीसह जेवणात दाळभाजी, ठेचा व भाताचा समावेश होतो. दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्र्यांना परभणी येथे जावयाचे असल्याने सकाळीच उठून स्नान करून पुढील कार्यक्रमास रवाना झाले.









