
कोलकाता- शारदा चिटफंड घोटाळ्यात सीबीआयने राज्याचे परिवहन मंत्री मदन मित्रा यांना अटक केल्याने मुख्यमंत्री ममता बॅनर्जी चांगल्याच खवळल्या असून ‘सहाराप्रमुखांसोबत फोटो आहे म्हणून सीबीआय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही अटक करणार का?’, असा थेट सवाल ममतांनी आज केला.
शारदा घोटाळ्यामुळे ममता विरूद्ध केंद्र सरकार असा उघड संघर्ष सुरू झाला आहे. ममतांनी आजपासून मित्रा यांच्या अटकेविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू केले. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदी तसेच सीबीआयच्या कार्यपद्धतीवर जोरदार हल्ला केला. ‘सहारा’ घोटाळ्यात सुब्रतो रॉय यांना अटक झाल्यानंतर ‘सहारा’च्या कार्यालयावर छापे टाकण्यात आले. या कारवाईत जप्त करण्यात आलेल्या डायरीत अनेक बडी नावे आढळून आलीत. सहाराप्रमुखांसोबत पंतप्रधान मोदींचाही फोटो आहे. मग फोटो हा जर गुन्ह्याचा पुरावा ठरत असेल तर सहाराप्रमुखांसोबत फोटो आहे म्हणून पंतप्रधानांनाही अटक व्हायला हवी, अशी मागणी ममतांनी केली.
शारदा चिटफंडच्या एका कार्यक्रमाच्या व्हिडिओ फुटेजमुळे मित्रा अडचणीत आले आहेत. या पार्श्वभूमीवर ममतांनी मोदींच्या फोटोचा मुद्दा छेडला. शारदा चिटफंडच्या प्रमुखासोबत सीपीएमच्याही अनेक नेत्यांचे फोटो आहेत. त्यांच्यावर का कारवाई करण्यात आली नाही, असा सवालही ममतांनी केला.
राजकारणाच्या आखाड्यात भाजप तृणमूलशी लढू शकत नाही त्यामुळेच सीबीआयला हाताशी धरून आम्हाला काऊंटर केलं जात आहे. भाजपच्या या राजकारणाविरोधात सामान्य जनताही आमच्यासोबत आहे, असे ममता म्हणाल्या. जे सत्तेत आहेत त्यांनी आपल्या मर्यादेत रहायला हवे, असा इशाराही त्यांनी केंद्र सरकारला दिला.
मित्रा मंत्रीपदी कायम!
मदन मित्रा यांना अटक करण्यात आली असली तरी ममतांच्या मंत्रिमंडळात मित्रांचं स्थान कायम राहणार आहे. मित्रा यांच्या अनुपस्थितीत त्यांच्या खात्याचा कार्यभार मी पाहणार आहे, असे ममतांनी सांगितले.









