नवी दिल्ली – केंद्रातील आणि अनेक राज्यांतील सत्ता गमावलेल्या काँग्रेसने नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतला असून पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी आज थेट पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र सोडले. मोदी सरकार हुकूमशहासारखे वागत असल्याचा आरोप सोनियांनी केला.
दिल्ली विधानसभा निवडणुकीची रणनीती आखण्यासाठी तसेच पक्षाची नव्याने बांधणी करण्याच्यादृष्टीने विचारविनिमय करण्यासाठी काँग्रेस कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक दिल्लीत झाली. या बैठकीत बोलताना सोनियां म्हणाल्या, ‘मोदींचे सरकारमधील सहकारी तसेच भाजपचे नेते प्रक्षोभक विधाने करत असताना मोदींनी त्याकडे दुर्लक्ष करण्याची सोयीस्कर अशी भूमिका घेतली आहे. लोकसभा निवडणुकीत मोदी यांची जी रणनीती होती त्याचाच हा पुढचा अंक आहे. यामागे दोन समाजांमध्ये दुही निर्माण करण्याचा उद्देश स्पष्टपणे दिसत आहे.’ केंद्र सरकार आपल्या कर्तव्यापासून दूर जात आहे. जनहिताच्या कामांकडे दुर्लक्ष केलं जात आहे, असेही सोनिया यावेळी म्हणाल्या. भाजपचे सरकार शेतकरीविरोधी असून त्याविरोधात देशभरात आंदोलन उभे केले जाईल, असा इशारा सोनियांनी यावेळी दिला.










