यवतमाळचे जांबुवंतराव, सांगोल्याचे गणपतराव

DHOTE2 GANPATRAO
पन्नास वर्षापूर्वी तमाम विदर्भात या घोषणा घुमत होत्या. त्यावेळी आधुनिक साधने नव्हती. वृत्तपत्रांचे स्वरूप आजच्या एवढे रेखीव नव्हते. आजच्यासारखे ‘डिजिटल युग’ नव्हते. नेत्याकडे जे भांडवल होते, ते म्हणजे तो स्वत: नेता, त्याच्या नेतृत्वाबद्दलचा विश्वास आणि त्या नेत्याची गरिबांबद्दल असलेली तळमळ..
यवतमाळचे जांबुवंतराव
‘वारे शेर आया शेर..’
पन्नास वर्षापूर्वी तमाम विदर्भात या घोषणा घुमत होत्या. त्यावेळी आधुनिक साधने नव्हती. वृत्तपत्रांचे स्वरूप आजच्या एवढे रेखीव नव्हते. आजच्यासारखे ‘डिजिटल युग’ नव्हते. नेत्याकडे जे भांडवल होते, ते म्हणजे तो स्वत: नेता, त्याच्या नेतृत्वाबद्दलचा विश्वास आणि त्या नेत्याची गरिबांबद्दल असलेली तळमळ.. आज जांबुवंतराव धोटे फारसे प्रकाशात नाहीत. पण नेतृत्वाची, जनतेच्या विश्वासाची ही सगळी लक्षणे ज्याला लागू पडतील, असा किमान सलग तीस वर्षे लोकांमध्ये टिकून राहिलेला, लोकांनी डोक्यावर घेतलेला आणि स्वत:करिता काहीही न मिळवणारा म्हणजे जांबुवंतरावभाऊ.
१९६२, ६७ या दोन टर्मची ही दहा वर्षे विधानसभा गाजवलेले भाऊ १९७१च्या लोकसभा पोटनिवडणुकीत नागपूरमधून खासदार म्हणून निवडून आले. मग १९८४ पर्यंत ते खासदार होते. ते आमदार किती वेळा होते आणि खासदार किती वेळा होते, यापेक्षा सुद्धा हे जे जांबुवंतराव होते, ते सगळ्यांपेक्षा वेगळे होते. आज जांबुवंतरावांची आठवण येण्याचे कारण त्यांचाच अचानक फोन आला. किती तरी दिवसांनी ‘मी जांबू धोटे बोलतोय. मधुकर तू कसा आहेस?’ भाऊंनी विचारले. मी म्हटलं, ‘भाऊ, आठवण कशी केली?’ त्यांनी आणखी एक धक्का दिला. ते म्हणाले, ‘अरे, आज आचार्य अत्रेसाहेब आणि तुझी एकदम आठवण आली..’ मी म्हणालो, ‘भाऊ, कुठे अत्रेसाहेब आणि कुठे चिल्लर मी.’ एकदम मनात गलबल झाली. आणि मग जांबुवंतरावांची अनेक रूपे समोर आली. एकेकाळी महाराष्ट्राची विधानसभा आणि नागपूरमधले लोखंडी पुलाखालचे सगळे नागपूर, गदगदा हलवणारे जांबुवंतराव म्हणजे खरे हनुमानच होते. हनुमंताने पर्वत हातावर उचलून आणला. भाऊंनी एकटय़ाच्या ताकदीवर कोणालाही करता येणार नाही, एवढी प्रचंड आंदोलने डोंगरासारखी हातावर उचलून आणली आणि यशस्वी करून दाखवली. साधने नव्हती, वृत्तपत्रे नव्हती, फोन नव्हते, ना टीव्ही होते, ना मोबाईल होते, ना गाठीला पैसा होता. होती फक्त जिद्द, बजरंगबलीची ताकद आणि लोकांचा विश्वास. आदल्या दिवशी भाऊंनी लोकांना चार जिल्हय़ात चिठ्ठय़ा पाठवाव्यात.. ‘उद्या विधानसभेवर लाखाचा मोर्चा आहे,’ आणि दुस-या दिवशी लाख माणसे मोजून घ्यावीत. चोवीस तासाच्या निरोपावर लाख माणसे त्यांच्याकरिता धावत होती. ना गाड्या-घोडे, ना टॅम्पो, ना खिचडी, ना पैसे. चिटणीस पार्क असो, वा कस्तुरचंद पार्क असो, तिथून निघालेल्या लाखालाखाच्या मोर्चात शेवटपर्यंत चालणारा हा एकमेव नेता होता. नाही तर पुढारी काय करतात, मोर्चा विधान भवनजवळ अडवला गेला की गाडीने येतात, भाषण करतात. गाडीने निघून जातात. भाऊंजवळ ना गाडी, ना घोडा. एसटीने जाणार, एसटीने येणार. हातावर भाकरी खाणार. लांब सोगा असलेले स्वच्छ धोतर, ते स्वत: धुणार. त्यावर तेवढाच स्वच्छ कुर्ता, हातात कडं, केसाची जटा. वाढलेली दाढी आणि त्यांचा तो अन्यायाविरुद्ध संतप्त झालेला चेहरा. कोणत्याही अन्यायाला ठेचून काढू की त्याचा जबडा फाडू अशा आवेशात त्यांचे वावरणे आणि अशी त्यांची भाषणे. एकवेळ निखारा हातात धरता येईल. पण भाऊंचा अन्यायाविरुद्धचा संताप शांत करणे कठीण. धगधगत्या निखा-यापेक्षा अन्यायाविरुद्ध त्यांची चीड जास्त प्रखर. त्यांनी कधी कोणाशी तडजोड केली नाही. कोणाकडे लाचारीने कधी उभे राहिले नाहीत. ना पैसा मिळवण्याच्या मागे लागले. ‘लोकांचा, लोकांसाठी असलेला नेता’ म्हणजे जांबुवंतराव. ते कोणत्या पक्षाचे आहेत, हे महत्त्वाचे नव्हते. पक्ष तोंडी लावण्यापुरता. पण खरा पक्ष म्हणजे जांबुवंतरावच. जांबुवंतराव हेच पक्षाचे निशाण. तेच म्हणजे जाहीरनामा. ते म्हणतील त्याला तिकीट आणि ते देतील त्या उमेदवाराला लोकांनी निवडून आणायचे. भाऊंच्या विश्वासावर विदर्भातल्या जनतेने अठरा-वीस आमदारांना फॉरवर्ड ब्लॉकच्या तिकिटावर निवडून आणले आहे. आणि निवडून आलेले अगदी साधे कार्यकर्ते. मग ते सुभाष कारेमोरे असतील, शंकरराव बोबडे असतील, हरीष मानधना, सुधाकर दुर्वे किंवा भाऊंचे उजवे हात नानाभाऊ एम्बडवार. भाऊंचा शब्द झेलायला ही हनुमानाची सेना हजर असायची. भगवंतराव गायकवाड, सुरेंद्र भुयार आणि नानाभाऊ यांना तर जांबुवंतरावांनी मंत्री केले. महाराष्ट्रात कोणताही पक्ष पाठीशी नसताना एक खांबी तंबू म्हणता येईल.. खांब कसला, लोखंडाची कांबच म्हणायला हवी. अशा पोलादी शरीराचे भाऊ किती वर्षे तुरुंगात राहिले हिशोब नाही. नागपुरातला विणकरांचा लढा, अकोला कृषीविद्यापीठाचा लढा, अमरावतीचे आंदोलन आयुष्यभर ते लढत राहिले. एक पाय तुरुंगात, एक पाय बाहेर. तुरुंगातसुद्धा त्यांना लादीवर झोपवले जात होते.
त्यांच्या संतापी स्वभावाने विधानसभेत त्यांनी एकदा अध्यक्षांच्या अंगावर पेपरवेट फेकला. बाळासाहेब भारदे यांना सुदैवाने तो लागला नाही; पण सभागृह भाऊंच्या विरोधात गेले. त्यांचे सदस्यत्व रद्द करण्याचा ठराव आला. सदस्यत्व रद्द झाले. दरम्यान भाऊंना तुरुंगवासही झाला. तुरुंगात असतानाच विधानसभेची पोटनिवडणूक लढवली. १९६२ची निवडणूक त्यांनी तीन हजार मतांनी जिंकली होती. पेपरवेट फेकल्यामुळे सदस्यत्व रद्द झाल्यानंतरची पोटनिवडणूक भाऊंनी ८ हजार ८८८ मतांनी जिंकली. ज्यांचं सदस्यत्व सभागृहाने रद्द केलं होतं ते जांबुवंतराव रुबाबात पुन्हा विधानसभेत आले. निवडून आल्यावर पुन्हा शपथ घेण्यासाठी अध्यक्षांनी नाव पुकारले. विधानसभा सचिवाजवळ भाऊ आले. त्यांनी माईक हातात घेतला. ते म्हणाले, ‘ज्या जांबू धोटेचे सदस्यत्व पाशवी बहुमताच्या जोरावर तुम्ही रद्द केलं होतं, तो जांबू धोटे मीच आहे आणि लोकांनी मला पुन्हा निवडून दिले आहे..’
काँग्रेसचे चंद्रपूरचे आमदार मा. दा. तुमपल्लीवार उभे राहिले. ते म्हणाले, ‘अध्यक्ष महाराज माझा हरकतीचा मुद्दा आहे. आमदारपदाची शपथ घेतल्याशिवाय सदस्याला भाषण करता येते का?’ त्यांचा मुद्दा तांत्रिक होता आणि तो बरोबर होता. पण भाऊंचा दरारा होता. ते तुमपल्लीवार यांच्या अंगावर ओरडले.. ‘चूऽऽऽप’ विधानसभेचे अध्यक्ष होते बाळासाहेब भारदे. ते एवढेच म्हणाले, ‘जांबुवंतरावांना बोलू द्या..’ आणि आमदारकीची शपथ घेण्याच्या अगोदर भाऊंनी भाषण केले. आणि सभागृहाच्या इतिवृत्ताचा ते भाषण भाग झाले. संसदीय इतिहासात हाही एक आगळावेगळा विक्रमच होता.
विधानसभेतील ती दहा वर्षे भाऊंची वर्षे होती. अधिकृतरीत्या ते विरोधी पक्षनेते नव्हते. पण दुस-या अर्थाने सभागृहात त्यांचा दरारा विरोधी पक्षनेत्याइतकाच सरस होता.
वर्षानुवर्षे प्रवाहाच्या विरुद्ध पोहत राहायचे ही सोपी गोष्ट नाही. मोर्चात, जाहीर सभेमध्ये, विधानसभेत अत्यंत संतापलेले भाऊ अनेकांनी पाहिले. पण एवढय़ा लढाऊ वृत्तीचा हा नेता मनाने एकदम हळवा आहे. निर्मळ आहे. वसंतराव नाईक यांच्याशी आयुष्यभर भाऊंचा वाद झाला; पण नाईकसाहेब गेल्यावर भाऊंच्या डोळ्यांतून पाण्याची धार लागली. महाराष्ट्राला खरं वाटणार नाही; पण त्यांचा संगीताचा अभ्यास केवढा मोठा आहे. वनस्पतीशास्त्राचा, पानांचा, फुलांचा अभ्यास किती मोठा आहे आणि शेतीचा अभ्यासही खूप मोठा आहे.
भाऊ आता ८४ वर्षाचे. पण ना कधी वाढदिवस, ना कधी कटआऊट. गरिबांसाठी सगळे आयुष्य पणाला लावणारे त्यांचे ते समर्पण कुठच्याही शब्दांत आणि तागडीत तोलता येणार नाही. फाटक्या माणसाचा पन्नास वर्षापूर्वीचा सगळ्यात मोठा आधार हाच धडधाकट माणूस होता. काळाची गती थांबत नाही. पण कर्तृत्वाचे विस्मरण होता कामा नये.

सांगोल्याचे गणपतराव
महाराष्ट्र विधानसभेत ज्या काळात आक्रमक जांबुवंतराव धोटे होते त्याच काळात अतिशय शांत प्रवृत्तीचे पंरतु आपला मुद्दा अतिशय खंबीरपणे मांडणारे गणपतराव देशमुख हेही होते. महाराष्ट्र विधानसभेतले सगळ्यात ज्येष्ठ आमदार म्हणून आजही गणपतराव देशमुख हेच आहेत. अकरा वेळा निवडून येण्याचा पराक्रम त्यांनी केलेला आहे. आजच्या राजकारणात एक निवडणूक जिंकली तरी आपण केवढा पराक्रम केला असे निवडून येणा-याला वाटत असते. किंवा निवडून आल्यानंतर पाच वर्षे त्याला चिंता असते ती पुढच्या निवडणुकीची. तेरा निवडणुका लढवून अकरा निवडणुका जिंकणारे गणपतराव असा कोणताही ताणतणाव न घेता निवडणुकीला उभे राहतात आणि हसत हसत निवडून येतात. गेल्या तीन-चार निवडणुकीत तर प्रत्येक वेळी ते सांगत होते की ‘ही माझी शेवटची निवडणूक.’ असं म्हणत म्हणत अकरा निवडणुका झाल्या. कार्यकर्ते त्यांना स्वस्थ बसू देत नाहीत. आग्रह करतात आणि गणपतराव पुन्हा उभे राहतात. निवडून येतात. महाराष्ट्राच्या राजकारणातला सर्व पक्षांना आदर असलेला हा एक नेता आहे. गेली पन्नास वर्षे त्यांना पाहतो आहे. ते जसे होते, तसेच पन्नास वर्षे आहेत. वयाचा किंचित परिणाम चेह-यावर झाला. पण सामान्य माणसाच्या प्रश्नासाठी विधानसभेत किंवा विधानसभेच्या बाहेर लढण्याची त्यांची जिद्द काही कमी झालेली नाही. नागपूरच्या एवढय़ा अधिवेशनाला सलग तीस वर्षे मी गेलो; पण नागपूरच्या थंडीत गणपतरावांनी कोट घातला, असे कधी पाहायला मिळाले नाही. त्यांची पांढरी पॅन्ट, पांढरा शर्ट या त्यांच्या पोषाखात ना कधी बदल झाला, ना गणपतरावांच्या स्वभावात कधी बदल झाला. विधानसभेत क्वचितच आवाज वाढवून ते बोलतात. त्यांचा मुद्दा दुर्लक्षित करण्यासारखा नसतो. प्रश्नाचा अभ्यास करण्याची त्यांची एक हातोटी आहे आणि प्रश्नाच्या मुळाशी जाण्याची प्रवृत्ती आहे. महाराष्ट्रात रोजगार हमी कायदा प्रभावीपणे राबवण्याचे ज्यांना ज्यांना श्रेय आहे, त्यात गणपतराव हेही प्रमुख आहेत. कृष्णराव धुळप, दि. बा. पाटील यांच्याप्रमाणेच रोजगार हमी हा गणपतरावांचा अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे. या रोजगार हमी योजनेवर पुरुष आणि महिला काम करतात. एका दुष्काळात तर सात-सात, आठ-आठ लाख लोक एकेका दिवशी कामावर होते, त्यात तीन-चार लाख भगिनी होत्या. पण या श्रम करणा-या महिलांना पुरुषांऐवढी समान मजुरी मिळत नव्हती. गणपतरावांनी हा विषय उचलला आणि थेट इंदिरा गांधींच्या समोरच हा विषय नेला. त्याचे असे झाले की, १९७४ साली श्रीमती इंदिरा गांधी पंतप्रधान असताना सोलापूरला एका कार्यक्रमाला येणार होत्या. गणपतरावांचा जिल्हा सोलापूर. ते सांगोल्याचे. त्यांनी त्यांच्याच जिल्ह्यातल्या रोजगार हमीवर काम करणा-या पाच-पंचवीस हजार महिलांना जमवले आणि इंदिरा गांधींचे विमान उतरणार होते, त्यांच्यासमोरच या भगिनींचा डेरा लावला. इंदिरा गांधी विमानातून खाली उतरल्या, समोर बघतात तर हजारो भगिनी. मुख्यमंत्री वसंतराव नाईकांना इंदिराजींनी विचारले, ‘इनकी क्या माँग है..?’ इंदिराजी तडक निघाल्या आणि मोर्चासमोर आल्या. गणपतरावांनी विषय समजावून सांगितला. बायांनाही समान मजुरी हवी हे पटवून दिले. एका मिनिटात इंदिराजी म्हणाल्या, माँग सही है. आणि सोलापूरच्या सभेत इंदिराजींनी तशी घोषणा केली. महिलांना समान मजुरी मिळण्याचे श्रेय गणपतरावांचे.
गणपतरावांचे आणखी एक काम फार मोठे आहे. कापसाचा एक बोंडसुद्धा ज्या सांगोल्यात होत नाही, तिथे गणपतरावांनी उत्तम सहकारी सूत गिरणी चालवली. इचलकरंजीत कलप्पा आवडेंची सूतगिरणी. सोलापुरात शिवदारे यांची सूतगिरणी आणि सांगोल्यात गणपतरावांची. या तिन्ही गिरण्या कापूस न पिकणा-या भागात आहेत. पण उत्तम चालतात. आणि केंद्र सरकारची बक्षिसे मिळवतात. कापूस पिकणा-या विदर्भातल्या सूतगिरण्या बंद पडल्या.
गणपतराव १९७८ साली शरद पवारांच्या मंत्रिमडळात रोजगार हमीचे मंत्री होते. मंत्रालयासमोरच छोटा बंगला होता. चालत यायचे आणि चालत जायचे. त्यांच्या कुटुंबीयांना त्यांनी मंत्री असताना मुंबईत कधीही आणले नाही. मी एकदा त्यांना विचारले की, तुम्ही कुटुंबीयांना का आणत नाही? ते सहज म्हणाले, ‘अहो आपल्या मंत्रीपदाचे काही खरे आहे का? शहराच्या सवयी लागल्या की मग खेड्यात राहायला अडचण होते.’ आमदार असतानाही वर्षानुवर्षे घरी बायकोला महिन्याला ५०० रुपये पाठवणारा हा आमदार. ‘लोकमत’मध्ये असताना मी त्यांचा फोटो टाकून लिहिले. ‘बायकोला महिन्याला पाचशे रुपये पाठवणारा आमदार’. त्या लेखाची चर्चा झाली. एकदा सांगोल्याला गेलो असताना गणपतरावांनी त्यांच्या सौभाग्यवतींची ओळख करून दिली. आपल्यावर ज्यांनी लिहिले होते ते हेच, असेही सांगितले. सौ. गणपतराव म्हणाल्या की, का हो खोटं लिहिलंत. मी म्हटलं, काय खोटं लिहिलं? मग गणपतरावांकडे बघून त्या म्हणाल्या, ‘कधी पाचशे रुपये पाठवलेत हो.. चारशे रुपये तर पाठवायचात.’ विधानसभेत प्रश्नाला लगेच प्रतिप्रश्न विचारणारे गणपतराव घराच्या प्रश्नाला मात्र क्षणात निरूत्तर झाले. असे हे साधे गणपतराव जसे आहेत तसे. ना ते बदलले ना एवढी वर्षे आमदार राहून त्यांचा सांगोला जिल्हा बदलला. तरी तिथल्या लोकांना आमदार हवे गणपतराव. असे तिथले मतदारही विलक्षण आणि आमचे गणपतरावही विलक्षण.
पन्नास वर्षापूवी व्यंकटेश माडगुळकरांनी ‘माणदेशी माणसं’ लिहिली. त्यातला धर्मा रामोशी हा सांगोल्याचा. त्या कथेत व्यंकटेशने दुष्काळी सांगोल्याचे चित्रण उभे केले. तो धर्मा आणि त्याची बया यांचे ते चित्रण मनाला भेदून जाणारे होते. आजही सांगोल्याच्या त्या स्थितीत फारसा फरक पडलेला नाही. आता गणपतराव यांच्या अखेरच्या या आमदारकीच्या काळात हे चित्र बदलावं अशी अपेक्षा.
(साभार – दै. प्रहार)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


one + = 2