येवल्याजवळ अपघात; सहा ठार

5021910053622160541_Org
येवला : शहरापासून मनमाडकडे बारा कि.मी. अंतरावर असणाऱ्या तांदूळवाडी फाट्याजवळ व्हॅन व टेम्पो यांच्यात समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात चार वर्षीय मुलासह सहा युवक ठार झाले. सदरची घटना रविवारी सकाळी सहा वाजेच्या दरम्यान घडली.
मारुती व्हॅनमधून (क्र. जीजे १८ एएस २९०१) मध्य प्रदेशातील नऊ भाविक शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी येत होते. सदरची व्हॅन तांदूळवाडी फाट्याजवळ हॉटेल मेवाडनजीक आली असता याचदरम्यान मनमाडच्या दिशेने निघालेला आयशर टेम्पो (क्र. एमपी ४६ जी ०७५३) यांच्यात जोरदार समोरासमोर धडक झाली. परिसरात हलक्या स्वरूपाचा पाऊसही सुरू होता.
भीषण अपघातामध्ये व्हॅनमधील पाच प्रवासी जागीच ठार झाले, तर अन्य चौघांना येवला ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून नाशिक रुग्णालयात पुढील उपचारासाठी रवाना केले होते. मात्र, रस्त्यातच चौघांपैकी एकाचा मृत्यू झाला, तर अन्य तिघांपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. अपघातातील मयतांपैकी चार जण मध्य प्रदेशातील डेहार (ता. कोकसे, जि. धार) येथील आहेत. त्यांची नावे अशी: जितेंद्र हनसिंग बगेर (२३), चेतन रमेश सिसोदिया (२१), शैलेंद्र पंकज बगेर (४), अनिल महेंद्र पटेल (२०), रवींद्र रणजितसिंग चव्हाण (३०, रा. गुडगु, ता. अली, जि. राजापूर, मध्य प्रदेश) आणि अनिल महेंद्र पटेल (१९) यांचा समावेश आहे. राहुल नानसी बामनिया (२२, रा. मानवतनगर, इंदूर) याच्या डाव्या पायाला गंभीर दुखापत झालेली आहे, तर अनिल चंद्रसिंग किराडे (२०, रा. डेहार, ता. कोकसे, जि. धार) याच्या डोक्याला जबर दुखापत झाली आहे. पंकज नारायण बगेर (२५) याच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली असून, त्यांच्यावर नाशिकच्या शासकीय ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


+ one = 7