
करंदिघी – तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांच्यावर मतांचे राजकारण करत असल्याच्या नरेंद्र मोदींच्या आरोपावर ममता यांनी सोमवारी चोख प्रत्युत्तर दिले. रक्ताने हात माखलेल्या लोकांनी देशाबद्दल बोलूच नये अशी बॅनर्जी यांनी मोदींवर नाव न घेता टीका केली. उत्तर दिनापूर येथील सभेदरम्यान त्या बोलत होत्या.
अटलबिहारी वाजपेयींचे सरकार असताना तृणमूल काँग्रेस केंद्र सरकारमध्ये सहभागी होता. तसेच गुजरातमध्ये झालेल्या दंगलीला त्यावेळी कोणीही समर्थन केले नव्हते असे त्यांनी म्हटले.मी कधीही हिंदू मुस्लिम यांच्यात फूट पडू देणार नाही. भाजपकडे जरी मोठ्या प्रमाणात निधी असला तरी पश्चिम बंगालमध्ये त्यांना एकही जागा मिळणार नाही असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.









