राजीवजींच्या मारेकऱ्यांना जन्मठेपच

नवी दिल्ली, वृत्तसंस्था – माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या तीन मारेकऱ्यांची फाशी शिक्षा जन्मठेपेत परावर्तित करण्याच्या आदेशावर सुप्रीम कोर्ट ठाम राहिले आहे. यासंदर्भात केंद्र सरकारने दाखल केलेली फेरविचार याचिका कोर्टाने फेटाळली आहे. खलिस्तानीवादी दहशतवादी देविंदरपालसिंग भुल्लरची फाशी रद्द करण्याच्या पाठोपाठ हा निर्णय आला आहे.
संथान, मुरुगन आणि पेरारीवलन या तीन मारेकऱ्यांच्या फाशीची शिक्षा सुप्रीम कोर्टाने १८ फेब्रुवारीला जन्मठेपेत परावर्तित केली आहे. राष्ट्रपतींकडे पाठविलेल्या दयेच्या अर्जावर योग्य वेळेत निर्णय न झाल्याने हा निकाल दिल्याचे कोर्टाने म्हटले होते. कोर्टाच्या या निकालानंतर राजकीय पटलावर विविध आरोप-प्रत्यारोप झाले. त्यानंतर केंद्र सरकारने फेरविचार याचिका केली होती. सरकारच्या याचिकेचा अभ्यास केल्यानंतर त्यात ठोस काहीही नसल्याचे स्पष्ट झाल्यानेच याचिका फेटाळल्याचे सरन्यायाधीश पी. सदाशिवम, न्या. रंजन गोगोई, न्या. एस. के. सिंग यांच्या खंडपीठाने म्हटले आहे. दरम्यान, तीन न्यायाधीशांच्या पीठाने याचिकेतील मुद्द्यांचा नीट अभ्यास केला नसल्याची प्रतिक्रिया केंद्र सरकारने दिली आहे. या प्रकरणात कायद्यातील तरतुदी, त्यातील गुंतागुंत अधिक व्यापक होती. त्यामुळे, शिक्षा बदलण्याचा निकालही, तीनऐवजी पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने घ्यायला हवा होता, असा युक्तिवादही याचिकेच्या सुनावणीदरम्यान सरकारने केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


+ 6 = thirteen