
मुंबई- राज्यातील देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार घटनात्मक तरतुदीनुसार स्थापन झालेले नाही. त्यामुळे भाजप सरकार बरखास्त करुन राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची भारीप बहूजन महासंघाची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी फेटाळून लावली.
न्यायमूर्ती व्ही.एम.कानडे आणि न्यायमूर्ती अनुजा प्रभूदेसाई यांच्या खंडपीठाने प्रकाश आंबेडकर यांनी दाखल केलेली याचिका फेटाळून लावली. राज्यात राष्ट्रपती राजवट संपुष्टात आल्यानंतर ८ ते १० नोव्हेंबर या दोन दिवसांच्या कालावधीत संवैधानिक यंत्रणाच अस्तित्वात नसल्याचे अॅड. आंबेडकर यांनी याचिकेत म्हटले होते. संवैधानिक यंत्रणा नसल्याने सरकार स्थापनेचा प्रश्नच उपस्थित होत नाही, असा दावा अॅड. आंबेडकर यांनी याचिकेत केला होता.









