
नवी दिल्ली – केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी सादर केलेल्या रेल्वे अर्थंसकल्पाबाबत काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी नाराजी व्यक्त केली.
‘यंदाचा रेल्वे अर्थसंकल्प निराशाजनक आहे. संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काही योजना सुधारित स्वरुपात मांडल्या आहेत’, अशी टीका त्यांनी यावेळी केली.
रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी लोकसभेत रेल्वे अर्थसंकल्प सादर करताना नव्या योजनांची घोषणाबाजी न करता रेल्वेच्या पायाभूत बदलावर अधिक भर दिला आहे. रेल्वेच्या प्रवासी भाड्यात कोणतीच दरवाढ करण्यात आलेली नाही मात्र त्याच बरोबर कोणत्याही नव्या गाड्यांची घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे या अर्थसंकल्पावरुन विरोधकांता नाराजी व्यक्त केली जात आहे. माजी रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल यांनीही मोदी सरकारचा अर्थसंकल्प निराशाजनक असल्याचे म्हटले आहे. डिझेलच्या दरात घट होऊनही प्रवासी भाड्याच्या दरात कपात न करणे हा अन्याय असल्याचे ते म्हणाले.









