नवी दिल्ली – भारताने नोंदवलेल्या तीव्र आक्षेपानंतर मुंबईवरील २६/११ दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार झाकीउर रहमान लख्वी पाकिस्तानी तुरुंगातच रहाणार आहे. लख्वीला गुरुवारी पाकिस्तानच्या दहशतवादविरोधी न्यायालयाने २६/११ हल्ला प्रकरणात जामीन मंजूर केला होता.
भारताने लख्वीला जामीन मंजूर होण्याच्या निर्णयाला जोरदार विरोध केला. त्यामुळे लख्वीची सुटका होताच त्याला कायदा व सुव्यवस्थेला धोका पोहोचवल्याच्या नव्या आरोपाखाली पुन्हा अटक करण्यात आली आहे. लख्वी तुरुंगातच रहाणार आहे.
भारताने शुक्रवारी सकाळी राजनैतिक अधिका-यांमार्फत लख्वीच्या सुटके विरोधात आपली नापसंती आणि चिंता पाकिस्तानला कळवली. लख्वीची सुटका पाकिस्तानच्या दहशतवादा विरुध्द लढण्याच्या कटिबध्दतेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करत असल्याचे भारताने आपल्या संदेशात म्हटले होते.
मुंबईवरील २६/११ दहशतवादी हल्ला प्रकरणात पाकिस्तानात लख्वीसह सात आरोपींविरोधात खटला सुरु आहे. मात्र कधी कायदा अधिका-यांच्या अनुपस्थितीमुळे तर कधी अन्य कारणांमुळे या खटल्याची सुनावणी वारंवार पुढे ढकलण्यात आली तसेच तहकूब करण्यात आली. भारताने वेळोवेळी या खटल्याचा मुद्दा पाकिस्तानकडे लावून धरला असून, पाकिस्तानने झटपट या खटल्याची सुनावणीपूर्ण करुन दहशतवादाविरुध्दचे आपले गांर्भीय दाखवून द्यावे अशी भारताची मागणी आहे.
पेशावरमध्ये लष्करी शाळेवर मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी बुधवारी समूळ दहशतवादाचे उच्चाटन करण्याचा इरादा जाहीर केला होता. त्यानंतर लगेचच गुरुवारी लख्वीला जामीन मंजूर झाल्याने पाकिस्तानच्या मूळ हेतूबद्दल पुन्हा शंका उपस्थित झाली होती










