लग्नांमुळेही शेतकरी कर्जबाजारी – केंद्रीय कृषिमंत्री

radhamohan
नवी दिल्ली -‘देशातील शेतकऱ्यांच्या कर्जबाजारीपणाचे मुख्य कारण शेतीसाठी घेतले जाणारे कर्ज नाही, तर कृषिकर्जांसह विविध कारणांमुळे होणाऱ्या पिकांच्या सततच्या नुकसानीमुळे अपेक्षित उत्पादन न मिळणे, आरोग्य आणि लग्न समारंभासारख्या इतर बाबींवर होणार खर्च हे शेतकऱ्यांच्या कर्जबाजारीपणाचे मुख्य कारण आहे,’ अशी माहिती केंद्रीय कृषिमंत्री राधामोहनसिंह यांनी शुक्रवारी राज्यसभेत बोलताना दिली.
राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासात बोलताना राधामोहनसिंह म्हणाले, ‘बीटी कॉटनसह विविध पिकांसाठी घेतले जाणारे कर्ज हे शेतकऱ्यांच्या कर्जबाजारीपणाचे मुख्य कारण नाही. तसा एक गैरसमज आहे. या कर्जबाजारीपणासाठी आर्थिक, सामाजिक कारणेदेखील तितकीच महत्त्वाची आहेत.’ ‘महाराष्ट्रात बीटी कॉटनची शेती मोठ्या प्रमाणावर केल्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झालेले नाहीत. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी बीटी कॉटनची लागवड केली होती. एकूण क्षेत्राच्या सुमारे ९० टक्के क्षेत्रांवर बीटी कॉटनची लागवड केली जात आहे. कृषिमूल्य आणि उत्पादन आयोगाने (सीएसीपी) केलेल्या शिफारशीनंतर शेती उत्पादनाची किमान हमी भाव (एमआरपी) सरकार जाहीर करते. सरकार नैसर्गिक आपत्ती, रोगांचा प्रादुर्भाव आदी कारणांमुळे होणाऱ्या शेतीच्या नुकसानीसाठी शेती विमा योजना राबवित आहे,’ असेही एका प्रश्नाला उत्तर देताना कृषिमंत्री म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


eight + = 17