लग्नाच्या दिवशी वऱ्हाडी बेपत्ता

baraat
औरंगाबाद – आठ महिन्यापूर्वी विवाह ठरला. साखरपुडाही पार पडला. ३ डिसेंबर रोजी विवाह करण्याचे निश्चित झाले. तरुणीकडील लोकांनी मंगल कार्यालय ठरविले. पाहुणे आले, नवरदेवाची, वऱ्हाडाची वाट पाहणे सुरू होते. मात्र, ऐनवेळी त्यांच्याकडून लग्नाला येत नसल्याचे कळविण्यात आले. शहरातील २७ वर्षाच्या तरुणीसोबत हा दुर्देवी प्रकार घडला असून वधूपक्षाच्या तक्रारीवरून जवाहरनगर पोलिस ठाण्यात नवऱ्या मुलासह कुटुंबावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गारखेडा भागात राहणाऱ्या मनिषा (वय २७, नाव बदललेले आहे) या तरुणीला मुंबई येथील अश्विन उल्हास हासनाळे यांनी एप्रिल महिन्यात लग्नासाठी मागणी घातली होती. त्यावेळी त्याचे वडील उल्हास हासनाळे हे देखील उपस्थित होते. १५ जून रोजी त्यांचा औरंगाबादला साखरपुडाही पार पडला. ३ डिसेंबर रोजी गारखेडा भागातील एका मंगल कार्यालयात विवाहाचे आयोजन करण्यात आले. मनिषाच्या कुटुंबाने लग्नाची सर्व तयारी केली. लग्नपत्रिका छापून नातेवाईकांना वाटण्यात आल्या. २ डिसेंबर रोजी मनिषाच्या वडिलांनी उल्हास हासनाळे यांना लग्नासाठी औरंगाबादला निघाल्याबाबत विचारणा केली. यावेळी नवरा मुलगा अश्विनला बरे वाटत नसून तो हॉस्पिटलला गेल्याची थाप मारण्यात आली. वारंवार संपर्क करूनही हासनाळे कुटुंबियांनी टाळाटाळ केली. ३ डिसेंबरपर्यंत वाट पाहून, संपर्क करुनही हासनाळे कुटुंब लग्नासाठी न आल्याने हा विवाह सोहळा अखेर रद्द करावा लागला. विवाहासाठी लागलेला पाच ते सहा लाखाचा खर्च यावेळी व्यर्थ गेला. या प्रकरणी मनिषाने दिलेल्या तक्रारीवरून आरोपी नवरा मुलगा अश्विन, त्याचे वडील उल्हास, आई पुष्पा, भाऊ हेमंत, बहीण क्रांती त्र्यंबके, क्रांतीचा पती, आत्या अलका शिंदे व अश्विनचे काका यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अश्विनचा यापूर्वी विवाह झालेला होता. ही बाब त्याने मनिषाच्या कुटुंबियांपासून लपवून ठेवली होती. त्यांना माहित झाल्यावर त्याने पहिल्या पत्नीचे चारित्र्य वाईट असून सारखे फीटस् येत असल्याने घटस्फोट घेतल्याची माहिती दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


× 2 = eight