
यवतमाळ – जिल्ह्यात सातत्याने वाटमारीच्या घटना घडत असून शुक्रवारी रात्री ९ वाजता भारी येथील पूलाजवळ लुटमार करण्याच्या उद्देशाने दबा धरुन असलेल्या टोळीला पोलिसांनी जेरबंद केले. त्यांच्याकडून तलवारीसह धारदार शस्त्र जप्त करण्यात आले.
विशाल गोपाल सोयाम (२५), मनोज रामूजी विश्वकर्मा (२५), विक्रम भाऊराव राऊत (२३), पराग उर्फ चिन्टु देवराव कानडे (२०), अमोल जनार्धन मगळे (१८), दिनेश भास्कर गुरनुले (२२) सर्व रा. माळीपुरा यवतमाळ, हेमंत कचनलाल राय (४४) रा. बालाजी चौक, यवतमाळ अशी आरोपींची नावे आहेत. तर अन्य दोन विधी संघर्षग्रस्त बालकांनाही ताब्यात घेऊन कारवाई केली. शुक्रवारी ९ मे रोजी रात्री ९ वाजता यवतमाळ पांढरकवडा मार्गावरील भारी येथील पूलाजवळ अंधारात शस्त्रासह हे सर्वजण लुटमार करण्यासाठी दबा धरुन बसले होते. या बाबतची गुप्त माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांना मिळाली होती. त्यावरुन मदने, शहरचे प्रभारी ठाणेदार सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल माळवे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अभय आष्टीकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अजय ढोले, जमादार संजय कांबळे, विजय जाधव, प्रमोद मडावी, इकबाल शेख, तुषार नेवारे, संतोष मडावी यांनी घटनास्थळ गाठून सर्व आरोपींना ताब्यात घेतले. पोलीस आल्याचे पाहुन आरोपींनी आपल्या जवळील तलवारींसह धारदार शस्त्र फेकून दिले होते. यावेळी पोलिसांनी सदर शस्त्र जप्त करुन आरोपींविरुद्घ गुन्हे दाखल केले. जिल्ह्यात सतत वाटमारीच्या घटना घडत असल्याने वाहनधारकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या आरोपींना अटक केल्याने अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.









