
नवी दिल्ली- लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात आसाममधील पाच आणि त्रिपूरामधील एका जागेसाठी सात एप्रिलला निवडणूक होत आहे. या सहा मतदार संघात एकूण ६४ उमेदवार उभे आहे. त्यांनी निवडणूक अर्ज भरताना निवडणूक आयोगाकडे दिलेल्या शपथपत्रानुसार त्यातील १७ उमेदवार करोडपती आहेत. या करोडपती उमेदवारांकडे प्रत्येकी सरासरी पाच कोटी ७५ लाख रुपयांची संपत्ती आहे.
सहा उमेदवारांवर गुन्हे दाखल असून त्यातील तीन जणांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यांच्यावर बलात्कार आणि खूनाचा प्रयत्न असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. यापैकी सर्वाधिक आसाम गण परिषदेचे (एजीपी) उमेदवार आहेत. एजीपीच्या पाच उमेदवारांवर गुन्हे दाखल आहेत. लॉटरी किंग मोनी कुमार सुब्बा हे सर्वाधिक श्रीमंत उमेदवार असून त्यांच्याकडे ३०६ कोटी रुपयांची संपत्ती आहे. इशान्य भारतातील ते सर्वाधिक श्रीमंत आहेत. ६४ पैकी १० जणांचे उत्पन्न चार लाख आहे. तर लाखिमपुर ऋषिकेश येथून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या एका उमेदवाराने आपल्याकडे अवघे नऊ हजार रुपये उत्पन्न असल्याचे सांगितले. यातील ३१ टक्के उमेदवार बारावी आणि त्याहून कमी शिकलेले आहेत. तर ६९ टक्के उमेदवार पदवी किंवा त्याहून अधिक शिकलेले आहेत. ५५ टक्के उमेदवार २५ ते ५० वयाचे आहेत. ४१ टक्के उमेदवार ५१ ते ७० च्या दरम्यान आहेत. तर तीन टक्के उमेदवारांनी वयाची सत्तरी पार केली आहे. यातील ९१ टक्के पुरुष असून महिलांचे प्रमाण अवघे नऊ टक्के आहे.









