वाघिणीची शिकार; आरोपींना सक्तमजुरी

19062014-md-ng-2-5319-1-large
अमरावती – व्याघ्र प्रकल्पातील ढाकणा येथील वाघिणीच्या शिकार प्रकरणातील दोषी ३ आरोपींना ५ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा आणि प्रत्येकी ९0 हजार रुपयांचा दंड अमरावती येथील मुख्य न्याय दंडाधिकारी जयंत राजे यांच्या न्यायालयाने ठोठावला आहे. तर यातीलच ३ आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता झाली. मात्र एका वर्षात अतिशीघ्र गतीने तेही एकाच वर्षात वाघाच्या शिकार प्रकरणी आरोपींना शिक्षा ठोठावणारे हे भारतातील पहिले प्रकरण ठरले आहे.
यामध्ये आरोपी मधुसिंग लिहारसिंग राठोड (३0), चिंताराम लिहारसिंग राठोड (२८) आणि विनोद प्रेमलाल पवार निघेट रा. सिंधबन मोथाखेडा ता. चिखलदरा यांचा समावेश आहे. तर सागरलाल गोरेलाल पवार, मिश्रीलाल जुगदया चव्हाण दोघे रा. सिंधबन व नरवीलाल रुचलेसिंग पवार रा. सावलीखेडा यांची सुटका झाली आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या गुगामल राष्ट्रीय उद्यानांतर्गत ढाकणा परिक्षेत्रातील बोरीपाटा राऊंडमध्ये येणार्‍या दक्षिण डोलार बिटमध्ये ४ मार्च २0१३ ला एका वाघिणीची राखीव वनक्षेत्रात शिकार करण्यात आली होती. आंतरराष्ट्रीय शिकारी रंजीत भाटिया (बावरिया) रा. हुशापूर पंजाब (६0) याने ४ आरोपींना लोखंडी चिमटा (ट्रॅप) दिला. त्या चारही आरोपींनी तो लोखंडी चिमटा घेऊन गाभाक्षेत्रातील धोकाग्रस्त व्याघ्र अधिवासात जाऊन सापळा रचला. ३ दिवसानंतर पुन्हा त्याच ठिकाणी गेल्यावर सापळ्य़ात एक पट्टेदार वाघीण अडकल्याचे दिसले. तेव्हा अनुकुचीदार भाला वाघिणीच्या तोंडात टाकून तिची हत्या करण्यात आली. वाघिणीच्या मिशा, नखे, हाडे, चामडे काढून ते दीड महिना घरात लपवून ठेवले व मांस समोरच्या दरीत फेकून दिले. यातील मधुसिंग राठोडने मध्यप्रदेशातील तुकईथळ रेल्वेस्थानकावर जाऊन वाघाचे अवशेष त्याच्या हवाली केले व सौद्यात ठरल्याप्रमाणे पैसे घेतले होते. दरम्यान, खबर्‍याने दिलेल्या गुप्त माहितीच्या आधारे मेळघाट वन्यजीव गुन्हे नियंत्रण शाखेच्या पथकाने लगेच आरोपींना अटक करून छडा लावला होता. या पथकाने संपूर्ण भारतात छापे मारून १३ जणांना अटक केली होती. १४ मे २0१३ हे प्रकरण न्यायालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणात ३ वेगवेगळय़ा चार्जशीट दाखल केल्या होत्या. १६ मे २0१३ ला फाईल ओके करुन १२ फेब्रुवारी२0१४ ला कोर्टात पुरावे सादर करण्यात आले होते. गत २ महिन्यांपासून या प्रकरणाच्या निकालाबाबत वनखात्यासह निसर्गप्रेमी वन्यजीव अभ्यासकांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. अमरावती येथील मुख्य न्यायदंडाधिकारी जयंत राजे यांच्या न्यायालयाने मधुसिंग लिहारसिंग राठोड, चिंताराम राठोड, विनोद प्रेमलाल पवार तिघे रा. सिंधबन मोथाखेडा या तिघांना ५ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा आणि प्रत्येकी ९0 हजारांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे. तर विनोद प्रेमलाल पवार, सागरलाल पवार आणि नटवीलाल पवार या तिघांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. याच प्रकरणात अनेश छात्रसिंग राठोड हा माफीचा साक्षीदार होता. मात्र त्याने वेळीच बयान बदलविल्याने त्याच्यावर खोटे बोलणे व शिकारीत सहभागी असल्याचा ठपका ठेवून अशा दोन ट्रायल चालविण्याचे आदेश न्यायालयाने बजावले आहेत. या प्रकरणात एकूण १४ आरोपींना अटक केली असून अद्यापही फरार आहे. जंगलातील अतिसंरक्षित क्षेत्रात आग पेटविणे, वाघ मारणे, व्याघ्र प्रकल्पात प्रवेश करणे, धोकाग्रस्त व्याघ्र अधिवासात शस्त्रास्त्र घेऊन शिरणे यासाठी प्रत्येकाला ५ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा आणी प्रत्येकी ९0 हजाराचा दंड सुनावण्यात आला. टायगर पोचिंग (वाघाची शिकार)मध्ये जलदगतीने एका वर्षाच्या आत निकाल लागणे हे भारतातील पहिलेच प्रकरण म्हणावे लागेल. कारण आतापर्यंतच्या इतिहासात इतक्या वेगाने कुठल्याही प्रकरणाचा निकाल लागला नाही, हे विशेष. न्यायालयात वनविभागाच्या वतीने जिल्हा विशेष सरकारी वकील अँड़ उदय शशीकुमार देशमुख तर आरोपींच्या बाजूने अँड़ पी.बी. महल्ले यांनी काम पाहिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


+ 2 = four