
तीन दिवसीय यवतमाळ ग्रंथोत्सवाचा समारोप
यवतमाळ, दि.3 : मराठी भाषेच्या माध्यमातून मराठी साहित्य दुरपर्यंत पोहोचले आहे. हे साहित्य संस्कृतीचे दर्शन घडविण्यासोबतच मानवाच्या मेंदुची भुख भागविण्याचे काम करीत असल्याचे प्रतिपादन आ.मदन येरावार यांनी केले.
नगर भवन येथे आयोजित तीन दिवसीय यवतमाळ ग्रंथोत्सवाच्या समारोप कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आर्णी येथील जेष्ठ साहित्यिक कवी प्रा.कलीम खान, जेष्ठ वऱ्हाडी कवी शंकर बडे, शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी, प्रा.डॉ.आशा देशमुख, कवी योगानंद टेंभुर्णे, जिल्हा माहिती अधिकारी मंगेश वरकड, जिल्हा ग्रंथपाल नितीन सोनोने उपस्थित होते. वाचनाशिवाय पर्याय नाही. त्यामुळे वाचकांना वाचनाची सवय लावण्यासोबतच त्यांना चांगले आणि दर्जेदार ग्रंथ उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. त्यासाठी ग्रंथ महोत्सवासारखे कार्यक्रम उपयोगी ठरणार आहे. ग्रंथ माणसाची दृष्टी व्यापक करते. मानवी मेंदुची भुख भागविण्यासोबतच ग्रंथ गुरुची भुमिका निभावत असते. त्यामुळे प्रत्येकाने ग्रंथ वाचनाची सवय लावावी, असे आ.येरावार यांनी सांगितले. यावेळी आपले मनोगत व्यक्त करतांना प्रा.कलीम खान यांनी ग्रंथ माणसाच्या जिवनातील आवश्यक बाब असल्याचे सांगितले. पुर्वी इलेक्ट्रानिक प्रसिध्दी माध्यमांचा भडीमार झाल्याने वर्तमानपत्र बंद होतील, अशी भाकीते केली जात होती. उलट वर्तमानपत्रे वाढीस लागली. त्याचप्रमाणे संगणकाच्या युगात कोणतीही माहिती तातडीने उपलब्ध होवू शकत असली तरी पुस्तकांचेही महत्व कधीही कमी होणारे नाही, असे कलीम खान म्हणाले. यावेळी शिक्षणाधिकारी वंजारी व कवी योगानंद टेंभुर्णे यांच्यासह अन्य मान्यवरांचीही भाषणे झाली. कार्यक्रमास कवी, साहित्यिक, लेखक, विद्यार्थी, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.









