
यवतमाळ दि. 24 : वाचनाशिवाय पर्याय नाही. त्यामुळे प्रत्येकाने वाचन ही आवड म्हणून विकसीत केली पाहिजे. त्याच अनुषंगाने सर्वसामान्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण होण्यासोबतच
विविध प्रकारची पुस्तके सहजरित्या एकाच ठिकाणी वाचकांना उपलब्ध व्हावी म्हणून ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले यांनी दिली.
यवतमाळ येथे दिनांक 31 जानेवारी पासून तीन दिवसीय ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात येत असून त्या निमित्त निवासी उपजिल्हाधिकारी खवले यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा माहिती कार्यालय येथे बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस समितीचे सदस्य ज्येष्ठ कवी शंकर बडे, प्रा.देवेंद्र पुनसे, प्राचार्य डॅा.आशा देशमुख, प्राचार्य अविनाश शिर्के, ग्रंथालय संघटनेचे कार्यवाह विनोद देशपांडे, अंकुर साहित्य संघाचे जिल्हाध्यक्ष तथा ज्येष्ठ साहित्यिक सुरेश गांजरे, बाबाराव मडावी, कवी आनंद गायकवाड, योगानंद टेभुर्णे, विनोद बुरबुरे, प्रा.निलेश भगत, आनंद कसंबे, प्राथमिक शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी, नपचे मुख्याधिकारी रविंद्र पांढरे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी नितीन सोनोने तथा आयोजन समितीचे सदस्य सचिव प्र.जिल्हा माहिती अधिकारी मंगेश वरकड यावेळी उपस्थित होते.
सुरुवातीस मंगेश वरकड यांनी ग्रंथोत्सव आयोजनाच्या तयारीची माहिती दिली. यावेळी खवले यांनी राज्यातील नामवंत पुस्तक प्रकाशकांसोबतच युवकांना उपयुक्त ठरणाऱ्या पुस्तकांची प्रदर्शनीही ठेवल्या जाईल, असे सांगितले. शासनाच्यावतीने वेळोवेळी प्रकाशीत होणारी परंतु वाचणीय पुस्तके आवर्जुण वाचकांना ग्रंथोत्सवाच्या निमित्ताने उपलब्ध करुन देण्यात यावी, असे ते म्हणाले.ग्रंथोत्सवानिमित्त पुस्तक प्रदर्शन व विक्रीसह विविध सांस्कृतिक कार्यक्रम व स्पर्धांचेही आयोजन करण्यात येणार आहे. त्यासंदर्भातही बैठकीत चर्चा झाली. बैठकीला उपस्थित आयोजन समितीच्या सदस्यांनी मौलिक सूचना केल्या. शेवटी आभार अंकुर साहित्य संघाचे जिल्हाध्यक्ष सुरेश गांजरे यांनी मानले. सदर ग्रंथोत्सव दिनांक 31 जानेवारी ते 2 फेब्रूवारी दरम्यान नगर परिषदेच्या नगर भवन येथे होणार आहे.









