
नागपूर – भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या प्रचारासाठी प्रसारमाध्यमे विकली गेली आहेत या आपल्या वादग्रस्त विधानावरुन आपचे प्रमुख नेते अरविंद केजरीवाल यांनी घुमजाव केले आहे.
नरेंद्र मोदींच्या प्रचारासाठी प्रसारमाध्यमांनी पैसे घेतले आहेत. उद्या आपचे सरकार आले तर, या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करुन, अशा विकाऊ पत्रकारांना तुरुंगात टाकू असे वादग्रस्त वक्तव्य केजरीवालांनी नागपूर येथील कार्यक्रमात केले होते. त्यांच्या या विधानावर काँग्रेस, भाजप आणि सीपीआयने जोरदार टीका केल्यानंतर त्यांनी आपल्या विधानावरुन घुमजाव केले. मी असे बोललोच नाही असे सांगत केजरीवालांनी पलटी मारली.गेल्या वर्षभरापासून प्रसारमाध्यमे नरेंद्र मोदींचा प्रचार करत आहेत. काही वृत्तवाहिन्यांचा तर, आता भ्रष्टाचार संपून रामराज्य येणार अशा पध्दतीने प्रचार सुरु आहे. वाहिन्या असे का दाखवत आहेत ? कारण त्यांना मोदींचा प्रचार करण्यासाठी पैसा देण्यात आला आहे. गेल्या दहावर्षात गुजरातमध्ये ८०० शेतक-यांनी आत्महत्या केल्या मात्र कुठल्याही वृत्तवाहिन्या या बातम्या दाखवत नाही. हा एक मोठा कट आहे उद्या आपचे सरकार आले तर अशा पत्रकारांना तुरुंगात टाकू असे वादग्रस्त विधान केजरीवालांनी या कार्यक्रमात केले होते.









