
नागपूर- विदर्भातील सहा शेतक-यांनी आत्महत्या केल्याचे विदर्भ जन आंदोलन समितीने गुरुवारी सांगितले. विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यात चार शेतक-यांनी तर अकोला आणि अमरावती जिल्ह्यात प्रत्येकी एका शेतक-याने आत्महत्या केल्याचे समितीचे प्रमुख किशोर तिवारी यांनी सांगितले. या सर्व शेतक-यांनी बुधवारी आत्महत्या केल्या आहेत.
लोकसभा निवडणुकीत भाजपने शेतक-यांचे प्रश्न सोडवले जातील असे आश्वासन दिले होते. दुष्काळ, कापूस आणि सोयाबीनला योग्य बाजार भाव आदी प्रश्न भाजप सरकार सोडवणार असे वाटले होते. पण प्रत्यक्षात काहीच प्रयत्न होत नसल्याचा आरोप तिवारी यांनी केला. त्यामुळेच शेतक-यांच्या आत्महत्या सुरुच आहेत.
राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाच्या नोंदीनुसार गेल्या वर्षभरात राज्यात तीन हजार १४६ शेतक-यांना आत्महत्या केल्या आहेत. देशातील अन्य कोणत्याही राज्यापेक्षा महाराष्ट्रात सर्वाधिक शेतक-यांनी आत्महत्या केल्याचे राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाने म्हटले आहे.









