
नाशिक – मनमाड रेल्वे स्थानकावर यशवंतपूर एक्सप्रेसमध्ये चालत्या गाडीत पॅनट्री (स्वयंपाक गृहातील) कर्मचाऱ्यांनी तापते तेल विद्यार्थ्यांच्या अंगावर फिरकावल्याचा प्रकार घडला. यात पाच जण जखमी झाले असून पोलिसांनी रेल्वे स्वयंपाक गृहातील १८ कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले आहे. तर जखमींना मनमाड उप जिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.
राष्ट्रीय विद्यार्थी काँग्रेसच्या कार्यक्रमासाठी बंगळूरहून दिल्लीकडे यशवंतपूर एक्सप्रेसने ६२ विद्यार्थी प्रवास करीत होते. यावेळी त्यांनी रेल्वे पॅनट्री कर्मचाऱ्यांकडून बिर्याणी घेतली. दरम्यान बिर्याणीमध्ये लोखंडी स्क्रू निघाल्याने त्याबाबत विचारणा करण्यास हे विद्यार्थी मॅनेजरकडे गेले असता, तेथील कर्मचाऱ्याने तापते तेल विद्यार्थ्यांच्या अंगावर फिरकावले. यादरम्यान बोगीत हाणामारी झाल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. तर हाणामारीत गरम पाणी खाली सांडल्याने ५ जण जखमी झाल्याचे पॅनट्री बोगी मॅनेजर यांनी सांगितले आहे. रेल्वे पोलिसांनी १८ जणांना ताब्यात घेतले असून ३ विद्यार्थी आणि २ पॅनट्री कर्मचारी यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान या सगळ्या गोंधळात यशवंतपूर एक्सप्रेस मनमाड स्थानकात एक तास खोळंबून होती.









