क्वालालंपूर – क्वालालंपूरहून २२७ प्रवाशांना घेऊन बीजिंगला निघालेलं आणि १२ तासांपासून गायब असलेलं मलेशिया एअरलाइन्सचं विमान चीनच्या दक्षिणेकडील समुद्रात कोसळल् आहे.बोइंग विमानाचा हा वर्षातील दुसरा अपघात असून, १९ वर्षांमधील ही सगळ्यात मोठी दुर्घटना ठरली आहे. या विमानातील २२७ प्रवाशांमध्ये चेन्नईतील एका महिलेसह पाच भारतीय नागरीकही आहे.
एम एच ३७० या बोइंग विमानानं काल मध्यरात्री १२ वाजून २१ मिनिटांनी (भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री १० वाजता) क्वालालंपूर विमानतळावरून ‘टेक ऑफ’ केलं होतं. चीनची राजधानी, बीजिंगला ते सकाळी साडेसहाला पोहोचणं अपेक्षित होतं. परंतु, उड्डाणानंतर दोन तासांनी या विमानाचा एअर ट्रॅफिक कंट्रोलशी संपर्क तुटल्यानं एकच खळबळ उडाली होती. प्रदीर्घ शोधमोहिमेनंतर, हे विमान व्हिएतनामच्या एअर स्पेसमध्ये कुठेतरी हरवल्याचं लक्षात आलं होतं. ही संपूर्ण हद्द पिंजून काढतानाच, हे विमान दक्षिण चीन समुद्रात कोसळल्याचं स्पष्ट झालं आहे.व्हिएतनामच्या नौसैनिकांना अॅडमिरल गो व्हॅन फॅट्ट यांनी तातडीनं घटनास्थळी पोहोचण्याचे आदेश दिल्यानं विमान कोसळल्याच्या वृत्ताला दुजोराच मिळाला आहे. या बातमीनंतर बीजिंग एअरपोर्टवर शोककळा पसरली आहे. मलेशिया एअरलाइन्सच्या या विमानात १४ देशांमधील २२७ प्रवासी होते, त्यात दोन चिमुरड्यांचाही समावेश होता. त्यापैकी सर्वाधिक १५२ प्रवासी चीनचे नागरिक होते. मलेशियाचे ३८, इंडोनेशियाचे १२, ऑस्ट्रेलियाचे सात आणि भारताचे पाच जण बीजिंगला निघाले होते. चंद्रिका शर्मा आणि सिरेगर फिर्मन चंद्रा यांच्यासोबतच क्रांती प्रल्हाद शिरसाट, चेतना कोळेकर आणि विनोद कोळेकर हे पाच जण अपघातात बेपत्ता झालेत.









